धनकवडी: आयुष्यातल्या असंख्य नानाविध आठवणी जेव्हा एकत्र येतात, आणि हिंदोळ्यावर झुलू लागतात, तेव्हा..नेमके काय वाट्ते याची आल्हाददायी हलकीशी जाणीव आज ऐश्वर्या च्या कट्ट्यावर मोराने फुलवलेल्या मोर पिसांची रंगत जणू निर्माण करून गेली.
निमित्त होते ज्येष्ठांच्या स्नेह मेळाव्याचे अन तिथे कित्येकांच्या आठवणींची पाने उजळली. अनुभवाचे संचित आणि वयाची समृद्धी यांचे देणे किती विलक्षण आणि मार्गदर्शक असते याची प्रचिती आज ऐश्वर्य कट्ट्यावर आली. आजचे निमंत्रित होते दक्षिण पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघांचे सर्व अध्यक्ष… सारे आज ऐश्वर्य कट्ट्यावर उपस्थित होते. यामध्ये भारती विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष आणि निवृत्त पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील,धनकवडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाजीराव गायकवाड, निवृत्त पोलीस निरीक्षक व मोरेबाग ज्येष्ठ नागरिक संघाचे अनंत राजेशिर्के,राजमुद्रा सोसायटीचे अध्यक्ष रसिककुमार दाभाडे,सावंत विहार सोसायटीचे तात्या शिंदे हे उपस्थित होते.
उतारवयात एकटं होऊन जगण्यापेक्षा आपल्याला सर्वांचं होऊन जगता यायला हवे असा संदेश या मान्यवरांनी सर्वाना दिला. आपल्या अनुभवाचे संचित सर्वांसमोर खुले केले.
शंकरराव पाटील यांनी पोलीस दलातील थरारक अनुभव सांगितले. बाजीराव गायकवाड यांनी शिक्षकी पेक्षा ते पत्रकारितेची वाटचाल याचा आढावा घेतला आणि अनेक गमतीशीर अनुभव सांगितले आणि कट्ट्यावर हास्याची कारंजी उडाली. अनंत राजेशिर्के यांनी पोलीस दलातील थरारक अनुभव कथन केले. रसिककुमारजी दाभाडे यांनीही आपली वाटचाल सांगितली आणि अनेक अनुभव सांगितले.
उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून शिंदेशाही पगडी, शाल मानपत्र देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी माझ्यासह वरिष्ठ पत्रकार पराग पोतदार,ॲड दिलीप जगताप,शंकर कडू,सचिन डिंबळे,रवींद्र संचेती, नेमीचंद सोळंकी,मधुकर कोंढरे,आकाश वाडघरे,मंगेश साळूंके,मनोज तोडकर,शिरीष चव्हाण आणि अप्पा रेणुसे मित्र परिवारातील अनेकजण उपस्थित होते.