पुणे-कर्नाटकमध्ये काँग्रेसचा दिमाखदार विजय झाल्याने जनमत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पराभवासह दक्षिणेतील अखेरचे राज्य देखील भारतीय जनता पार्टीने गमावले आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी, अमित शहा व कर्नाटक राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे,असे मत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व्यक्त केले आहे.
एकीकडे देशातील मणिपूर सारखे राज्य दंगलीमध्ये जळत असताना देशाच्या पंतप्रधानांनी मात्र त्या घटनेकडे पूर्णपणे पाठ फिरवत कर्नाटकमध्ये येऊन प्रचार करण्यास पसंती दिली, पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना घेतलेल्या नैतिकतेच्या मूल्यांचा देखील पंतप्रधानांना विसर पडला. केवळ सत्ता आणि सत्ता हेच भारतीय जनता पार्टीचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी जातीय दंगली भडकवणे, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे यांसारख्या कुठल्याही स्तराला ते जाऊ शकतात, हेच या घटनेतून पाहायला मिळाले. पण सरते शेवटी कानडी जनतेने या सर्व गोष्टींचा सारासार विचार करत भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेसला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला आहे.
देशात लोकशाही विरोधात सुरू असलेल्या अनेक घडामोडी, ऑपरेशन लोटस व खोट्या ईडी कारवाया करत मिळवलेली सत्ता, महागाई, बेरोजगारी, शेतमालाला हमीभाव या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत केवळ धार्मिक व विषारी मुद्द्यांकडे लक्ष वेधत देशातील जनतेला अस्थिर वातावरण देणाऱ्या भारतीय जनता पार्टीसाठी ही मोठी चपराक आहे. येत्या काळात राज्यासह संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीला अशाच प्रकारे सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय, शेतकरी आणि देशातील बेरोजगार तरुण नाकारणार, हेच या विजयातून स्पष्ट होते
कर्नाटकमधील सर्व विजयी उमेदवारांचे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हार्दिक अभिनंदन.