पुणे: आजच्या काळात संपूर्ण जगाला शांततेची गरज आहे. मनुष्य हा भविष्य व भूत काळाचा विचार करतो परंतू बुद्धांनी वर्तमान काळात सुखी राहण्याचे तत्त्व मांडले. त्यासाठी बुद्धांच्या ज्ञान मार्गावर चालून जीवन समृद्ध करता येते. शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी ध्यान साधना अत्यंत महत्वाची आहे. असे उद्गार ज्येष्ठ लेखक डॉ. रतनलाल सोनग्रा यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, ह.भ.प.बापूसाहेब तुपे महाराज, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, कुलसचिव गणेश पोकळे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव व प्रा. विक्रांत गायकवाड उपस्थित होते.
डॉ. रतनलाल सोनग्रा म्हणाले, बौध्द धर्माचा अवलंब करणे म्हणजे शांतता, एकता आणि अहिंसा होय. जगाला सत्य, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचे तत्त्व मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत. बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश देऊन अहिंसा व करूणेची शिकवण दिली.
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, भगवान गौतम बुद्धांचे पंचशील तत्त्व आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हेच संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकेल. त्यांनी संपूर्ण जगासमोर ज्ञानाचे स्वरूप मांडले. त्याच्या ज्ञानाच्या दिव्य प्रकाशात आज संपूर्ण जग शांती शोधत आहे. बुद्धांनी विश्वधर्म, मानवकल्याण आणि जातिभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र आणण्याचे महत्कार्य केले आहे.
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, बुद्धांचे विचारच जीवनाला प्रेरणा देणारे आहेत. त्याच आधारावर डॉ. विश्वनाथ कराड यांनी रामेश्वर रूई येथे बुद्ध स्तूपाची निर्मिती करून समाज एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ.एस.एन.पठाण यांनी सांगितले भगवान गौतम बुद्ध हे शांतीदूत म्हणून ओळखले जातात व त्यांनीच जगाला शांतीचे तत्त्व सांगितले.
यावेळी मैत्रेय बुध्द व तथागत भगवान गौतम बुध्द विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विश्वशांती भवन या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
ह.भ.प.बापूसाहेब तुपे महाराज यांनी बुद्ध जयंती ही शाश्वत असल्याचे सांगितले. डॉ. आर.एम. चिटणीस व डॉ. मिलिंद पात्रे यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार मांडून त्यातून बोध घेण्यास सांगितले.
प्रा. विनोद जाधव यांनी प्रास्ताविक केले.