विश्वशांती केंद्रातर्फे तिर्थक्षेत्राचे रुपांतर ज्ञानतीर्थ क्षेत्रात करणे या परिसंवादाचे उद्घाटन
पुणे, २२ नोव्हेंबरः आज समाजामध्ये क्रुरता, द्वेष, मत्सर यांबरोबरच अन्य अवगुणांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. या पार्श्वभूमीवर करुणा, भावना, सभ्यता, संस्कृती, शास्त्र आणि शांती इत्यादीचे विकास हा केवळ तिर्थक्षेत्राचे ज्ञानतीर्थ क्षेत्रात रूपांतर झाल्यासच होईल. ती आजच्या काळाची गरज आहे. त्यातूनच समाजाचा सर्वांगिण विकास होईल. अशी भावना भारत सरकारचे माजी सचिव डॉ. कमल टावरी यांनी व्यक्त केली.
अॅडिशनल अॅक्शन फॉर पिपल्स प्लॅनिंग अॅण्ड पॉलिसिज कमिशन्स अॅपकॉम, नवी दिल्ली व विश्वशांती केंद्र आळंदी, पुणे, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वराजबाग, लोणीकाळभोर येथील एडीटी विद्यापीठातील राजकपूर मेमोरिअल सभागृहात तिर्थक्षेत्राचे रुपांतर ज्ञानतिर्थ क्षेत्रात करणे या विषयावर आयोजित एक दिवसीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, इस्लामिक विचारवंत व समाजसेवक डॉ. रफीक सय्यद, पुणे येथील जामा मस्जिदचे मौलाना अयुब अशरफी, थोर साहित्यिक प्रा. रतनलाल सोनाग्रा, डीडी सह्याद्रीचे माजी संचालक मुकेश शर्मा आणि अण्णाहजारे यांच्या आंदोलनातील कार्यकर्ता कल्पना इनामदार हे उपस्थित होते.
डॉ. कमल टावरी म्हणाले, आज समाजामध्ये मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. प्रेम आणि वात्सल्य यावर लक्ष्य केंद्रीत करणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन होतांना दिसत आहे. ज्ञान आणि विवेक बुद्धिवर तरुणांनी लक्ष केंद्रीत करुन त्याला विज्ञानाची जोड दयावी.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, सध्याच्या जगात वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षणाची अत्यंत गरज आहे. श्री क्षेत्र आळंदी, देहू, पंढरपूर, काशी, बनारस, मक्का मदिना, चर्च, गुरद्वार व अन्य सर्व तीर्थ क्षेत्रे हे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्र आहेत. येथे संतांनी व ऋषीमुनींनी जे ज्ञान उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळेच या तीर्थ क्षेत्रांना विशेष महत्व प्राप्त झाले आहेत. संतानी दिलेला संदेश आजच्या तरूण पिढीने आत्मसात करून जीवनाची वाटचाल करावी.
प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले, संस्कृती, सभ्यता आणि परंपरेचा विचार केल्यास ते देशातील प्रत्येक धार्मिक स्थळांमध्ये दिसून येते. येथे सुख, शांतीची अनुभूती होत असल्याने लाखो भाविक येथे रोज येतांना दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे देशाला एकरुप करण्याची ही एक योजनाच असते. यामुळेच सर्व धार्मिक स्थळे हे ज्ञानाचे केंद्र बनावे.
मौलाना अयुब अशरफी म्हणाले, प्रत्येकाच्या आत्म्यात खुदाचे अस्तित्व जरी असले तरी आपण खुदाने सांगितलेल्या मार्गावर चालल्यास सृष्टीवर कलह होणार नाही. रोजगाराभिमूख शिक्षण असल्याने यातून आदर्श व्यक्तीची निर्मिती होतांना दिसत नाही. शिक्षणातून चांगले व्यक्तित्व निर्माण झाल्यास त्यातून चांगले डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, तंत्रज्ञ घडतील. त्यातूनच एक सुसंस्कृत समाज घडेल.
डॉ. रफीक सय्यद म्हणाले, देवाने या सृष्टीवर मानवाला सर्वोत्कृष्ट बनविले आहे. परंतू मानवाने स्वतःच्या कर्माने स्वतःला खालच्या स्तरावर पोहचविले आहे. जीवन जगतांना आपला उद्देश्य काय आहे. जीवन कसे जगावे हे आम्हाला आमचे देवस्थान शिकवितात. त्यामुळेच मानवाला मानव बनविण्याचे कार्य हे तिर्थक्षेत्रातून होतांना दिसत आहे. हिच तीर्थक्षेत्र आता ज्ञानतिर्थ क्षेत्र व्हावे.
डॉ. एस.एन.पठाण यांनी प्रस्तावनेत सांगितले की भारत हा मंदिरांचा देश आहे. त्यातच डॉ. विश्वनाथ कराड यांनी बद्रीनाथ येथे माता श्री सरस्वती धाम मंदिराची निर्मिती केली. देशातील शिक्षण प्रणालीमध्ये विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वयक केल्यास या जगात सुख, शांती नांदेल. त्यासाठी देशातील प्रत्येक धार्मिक स्थळे ही ज्ञानाचे दालन बनावे. याच पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्राचे रुपांतर ज्ञानतीर्थ क्षेत्रात करणे या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले आहे.
यावेळी मुकेश शर्मा यांनी विद्यार्थ्यांना विचार करुन भविष्यातील निर्णय घेण्याचा सल्ला दिला.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक घुगे यांनी केले.