९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत
पुणे, दिः ६ सप्टेंबर: “शिक्षकांनी ज्ञान, कौशल्य आणि दृष्टीकोन या तीन गोष्टींवर भर दयावा. विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घ्यावे. तसेच, नवनिर्मिती व संशोधनाचे कार्य करून ते समाजोपयोगी कसे होईल हे पहावे.”असे विचार एआरएआयच्या अॅकॅडमी व नॉलेज सेंटरचे वरिष्ठ उपसंचालक व प्रमुख डॉ. के. सी. वोरा यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातर्फे कोथरूड कॅम्पस येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक व प्रमुख प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.पी.बी.जोशी, माजी अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, मॅनेजिंग कमिटीचे विश्वस्त आणि अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, सह व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.सुचित्रा कराड नागरे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर हे उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेतील विविध शाखांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कर्नल आर.पी.गुप्ता (मायमर मेडिकल कॉलेज, तळेगाव), डॉ. सुनिल विष्णू डिंगरे (एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी-काळभोर), प्रा.शितल गिरासे(एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरूड), किसन दगडू बुचडे (संत ज्ञानेश्वर विद्यालय, कोथरूड), प्रभाकर शंकरराव घुले (एमआयटी स्कूल, अंबेजोगाई), श्रीराम नारायणराव कारगांवकर (एमआयटी आर्ट, सायन्स व कॉमर्स कॉलेज, आळंदी), डॉ. बबन देवीदासराव आडगावकर (एमआयएमएसआर, लातूर), डॉ. आरिका मदन कोठा (एमआयटी एओई, आळंदी) आणि रूपाली गुर्जर (व्हीजीएस, वाखरी, पंढरपूर) यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सन्मानपत्र, संत श्री ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ.के.सी. वोरा म्हणाले,“कोरोना काळात संपूर्ण जग थांबले होते. परंतू शिक्षकांनी आपले कर्तव्य बजावून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य केले. शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो. त्यामुळेच त्यांनी सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करावे. नवनिर्मिती, संशोधनात्मक कार्य व पेपर्स या सारख्या गोष्टींवर भर द्यावा. शिक्षकांनी जवळपास सर्वच क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करण्यासाठी विभिन्न पुस्तकांचे वाचन करावे. शिक्षकांमध्ये शिकविण्याचे पॅशन असून त्यांनी समाजपयोगी संशोधन करावे. उद्योगधंद्याला उपयोगी पडणार्या संशोधनाची निर्मिती जर झाली तर भारत आत्मनिर्भर बनेल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“इंग्लंडमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देतांना त्यांच्यावर बिंबविण्यात येते की तुम्हाला जगावर राज्य करावयाचे आहे. त्यामुळेच इंग्रजांनी अनेक देशांवर राज्य केले होते. या देशात सर्वगुण संपन्न पिढी घडविण्यासाठी शिक्षकांमध्ये शिस्त आणि चारित्र्य या दोन गोष्टी असणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण करीत असलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचे सतत आत्मपरिक्षण करावे. संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा संदेश देण्याची वेळ आली आहे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार २१ व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन बनून विश्वगुरू म्हणून उदयास येईल. त्यामध्ये शिक्षकाची भूमिका महत्वाची असेल.”
प्रा.पी.बी.जोशी म्हणाले,“ग्रंथ हे गुरू आहेत. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाला अधिक महत्व देऊन ज्ञानार्जन करावे. शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न व संपन्न असावे. शिक्षकांनी बोले तैसा चाले असे असावे, सतत विद्यार्थ्यांच्या संपर्कात असावे आणि वेगवेगळ्या विषयाचे ज्ञान त्यांनी आत्मसात करावे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“या देशाला चाणक्यापासून गुरू शिष्याची परंपरा आहे. आज देशात वसाहतवादी मानसिकता बदलण्याची गरज आहे. याची चळवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज या देशात २६ कोटी प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी असून १ कोटी शिक्षक आहे. तसेच, ३ ते ५ कोटी उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ३ लाख शिक्षक सेवा देत आहेत. आज कोविडच्या काळानुसार ऑनलाइन शिक्षणावर अधिक जोर दिल्यामुळे पुढील काळात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असेल. तंत्रज्ञान आणि संशोधनाची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्याचे काम शिक्षकांनी करावे.”
प्रा.डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले,“या शिक्षक दिनी जागतिक दर्जानुसार आपल्याला घडवण्याचा संकल्प करावा. आजच्या काळानुसार शिक्षकांनी नवी भूमिका स्विकारून वर्जन १.० वरून २.० वर कसे जाता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे. आज ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांमध्ये संशोधनला अत्याधिक महत्व दिले जाते. परंतू देशातील शिक्षण पद्धतीत वरिष्ठ, ज्यूनिअर व अहंकाराची समस्या मोठी आहे. यातून बाहेर निघण्यासाठी मानसिकता बदलावी.”
या वेळी सर्व पुरस्कारार्थींच्या वतीने कर्नल आर.पी गुप्ता म्हणाले, देशाच्या हितासाठी शिक्षकांनी काम केले पाहिजे. त्यासाठी त्यांना विष पिण्याची वेळ आली तरी त्याचा स्विकार करावा.
प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस यांनी आभार प्रदर्शन केले.