पुणे- “नॅनो टेक्नॉलाजीच्या मदतीने वैज्ञानिक नवनिर्मिती करीत आहेत. तसेच, पीएनपी म्हणजेच फिनाइल मिथेल या नवीन संयुगाने भविष्यातील तंत्रज्ञान संपूर्णपणे मानवाचे जीवन बदलून टाकणार आहे. त्यामुळे सामाजिक व आर्थिक गणितेही बदलणार आहेत. अशा वेळेस उदयोन्मुख तंत्रज्ञानाला आत्मसात करणे गरजेचे आहे.” असे विचार लोकसत्ता पार्टीचे संस्थापक डॉ. जयप्रकाश नारायण यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व ब्रिटिश डेप्युटी हायकमिशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन’ या विषयावर आयोजित ‘युवा विचारवंतांच्या परिषदेत’ प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी नवी दिल्ली येथील ब्रिटिश हायकमिशनच्या राजकीय आणि द्वीपक्षीय बाबींचे प्रमुख रिचर्ड बार्लो, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एन.आर.राव, प्र-कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे, पॉल कार्टर, मिटसॉगच्या सहयोगी संचालिका प्रा.डॉ. शैलश्री हरिदास, मिटसॉगचे प्रमुख परिमल सुधाकर व श्री. आशिष लाल हे उपस्थित होते.
डॉ. जयप्रकाश नारायण म्हणाले,“ तंत्रज्ञानाच्या युगात चार आमूलाग्र बदल घडले आहेत. प्रथम यंत्रयुग, विद्युतनिर्मिती, डिजिटिलाइजेशन आणि फिजिकल डिजिटिलाइजेशन व बायोलॉजीकलचा समावेश आहे. येणार्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. तसेच, आर्थिक व सामाजिक परिवर्तन होईल. या सृष्टीवरील तेल संपत आल्यामुळे पुढील १० वर्षात सोलर एनर्जी क्षेत्रात प्रगती होईल. परिणामतः पर्यावरण बदलेल. वाढत जाणार्या लोकसंख्येमुळे आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान महत्वाची भूमिका पार पाडेल.”
“ वाहन उद्योग व गृहनिर्मिती या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाल्याने आज समाजातील आर्थिक व सामाजिक गणित बदले आहे. रेडिओलॉजी, सप्लाय चेन, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स सारख्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील .”
रिचर्ड बार्लो म्हणाले,“ भविष्यात मनुष्याचे रूपांतर हे मशिनमध्ये होईल. कारण आधुनिक युगात तंत्रज्ञानाने मानवाचे जग बदलविले आहे. जगातील कोणत्याही भाषेचे अनुवाद क्षणात होत असल्याने विचारांचे आदान-प्रदान उत्तमरित्या होत आहे. यामुळेच आज संपूर्ण समाज मोठ्या प्रमाणात बदललेला आहे आणि पुढे ही बदलत जाईल.”
या एक दिवसीय परिषदेत विभिन्न क्षेत्रातील मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचे भवितव्य, आंतरराष्ट्रीय संबंध, स्वायत्तता, समावेश आणि सुरक्षा या विषयांसहित कृत्रिम बुध्दिमत्तेच्या युगातील कौशल्य, कृत्रिम बुध्दिमत्ता आणि नीतिमत्ता, गुप्तता, सुरक्षा आणि जवाबदारी / मूल्यमापन आणि कृत्रिम बुध्दिमत्तेची मध्यम ऑनलाइन सामग्रीः ढोबळमानाने माहिती देणे योग्य का, अशा वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद झाला.
या परिषदेच्या समापन सत्रात माजी खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी म्हणाले, येणार्या १० ते १५ वर्षात कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे मानवाजवळ सर्व काही असेल परंतू, प्रेम व मानवता नसेल. भारतीय संस्कृतीचे वसुधैव कुटुंबकम्ची संकल्पना संपुष्टात येईल. त्याच प्रमाणे जवळपास ८ हजार विविध क्षेत्रातील रोजगार कमी होतील, पण नवे रोजगार जसे स्पोर्टस, कुकींग, आर्टस, अकांउंट, मानसशास्त्र, मॅनिफॅक्चरींग क्षेत्र व कोणत्याही क्षेत्रातील गुणवत्तेला प्रचंड मोठ्या प्रमाणात वाव असेल, यासर्व गोष्टींचा विचार विद्यार्थ्यांनी करावा.
प्रा.डॉ. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. अनुराधा पै यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. परिमल सुधाकर यांनी आभार मानले.