पुणे, 3 जानेवारी:“धर्म, राष्ट्र, समाज व मानवतेसाठी विश्वेशतीर्थ स्वामीजींनी आपले आयुष्य वेचले आहे. ते अध्यात्माक्षेत्रातील महान विभूती होते. त्यांनी केलेले कार्य आपल्या जीवनात उतरवून आचरणात आणणे हीच खरी श्रध्दांजली असेल,” अशी भावना महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्यावतीने पेजावर अधोक्षज मठाचे ज्ञानमठाधिपती,वेदविद्यासंपन्न, ऋषितुल्य विद्वान, महान साधन, तपस्वी, विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक, सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते, परमपजूनीय व आदरणीय ज्ञानब्रह्मऋषी वै. श्री. विश्वेशतीर्थ स्वामीजी यांना कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू येथे भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, विश्व हिंदू परिषद पुणेचे प्रमुख शरद कुंटेे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसन्तराव गाडगीळ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एन.टी. राव, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्रा. डॉ. आर.एम.चिटणीस, प्रा.डी.पी. आपटे, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्टॅटेजिक डेव्हलपमेंट अँड स्टूडेंड वेल्फरचे संचालक प्रा.डॉ. रामचंद्र पुजेरी आणि सौ. उषा विश्वनाथ कराड हे उपस्थित होते.
गोविंद गिरी महाराज म्हणाले,“माधव सेवेतून मानव सेवा हा उद्देश ठेवून त्यांनी संपूर्ण जगभर कार्य केले. विश्वची माझे घर हा संदेश देऊन त्यांनी मानवकल्यणासाठी कार्य केले. सर्वधर्म समावेशक असलेले स्वामीजी यांनी सदैव मानव उध्दारासाठी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केले. हिंदू धर्मामध्ये त्यांना आदर्श महाराज म्हणून ओळखले जाते.”
प्रा.डॉ.विश्वनाथ कराड म्हणाले,“त्याग आणि समर्पणाची मूर्तिमंत प्रतीक असलेले स्वामीजी स्वर्गवासी झाले. त्यामुळे आपल्या देशाची सांस्कृतिक व अध्यात्मिक क्षेत्राची फार मोठी हानी झालेली आहे. पुन्हा अशी महान व्यक्ती या सृष्टी होणार नाही.विश्वराजबाग येथे संपूर्ण जगातील पहिले विश्वरूप दर्शन देवता मानवता मंदिरची प्राण प्रतिष्ठापना त्यांनी केली. ते आजारी असतानाही त्यांनी स्वयंप्रेरणेने येथे येऊन विश्वरूप दर्शन देवता मानवता मंदिरात आले होत. स्वामीजी हे खर्या अर्थाने राष्ट्रधर्मपूजक होते.”
शरद कुंटे म्हणाले,“ भारतीय संस्कृती ही जगातील सर्वोत्कृष्ठ असल्यांने त्यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना करून देशात भारतीय संस्कृतीचे बीजे जनतेच्या मनात रोवण्याचे काम केले.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले ,“ विज्ञान, अध्यात्म आणि वैश्विक तत्त्वज्ञान या विषयावरील जागतिक परिषदेत सर्व धर्मग्रंथ हे खर्या अर्थाने जीवनग्रंथ आहेत या महत्वपूर्ण परिसंवादात श्री विश्वेशतीर्थ स्वामी यांनी विश्वशांती व मानवी कल्याणाचा संदेश देणारे हिंदूंचे पुराण आणि मुस्लिमांचे कुराण यांचा खर्या अर्थाने समन्वय व संयोग होण्याचे विचार मांडले.”
याप्रसंगी प्रा.डॉ. मिलिंद पांडे, पं. वसन्तराव गाडगीळ, प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी व प्रा.डी.पी. आपटे यांनी स्वामीजींच्या आठवनींना उजाळा देऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली.
यावेळी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी श्री. विश्वेशतीर्थ स्वामीजी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.