पुणे: महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शक्रवारी माईर्स एमआयटीच्या सर्व संस्था व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने एमआयटी कॅम्पस, कोथरूड येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड म्हणाले,“भारत देशाची राष्ट्रभाषा संस्कृत असावी असे सांगणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत. पुस्तकांच्या विषयी त्यांचे प्रेम, त्यांची ग्रंथालय, त्यांचे अध्ययन या सर्व गोष्टी जगाला दिलेले एक उदाहरणच आहेत. त्यांनी जीवनभर केलेल्या कार्यातील एक तरी गुण आपल्या जीवनात उतरवावा. ही खर्या अर्थाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.”
प्रा. विनोद जाधव म्हणाले,“ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैयक्तिक ग्रंथालय हे सर्वात मोठे होते. ते दररोज जवळपास १८ तास अध्ययन करायचे. शिक्षण, समाज प्रबोधन, राजकारण आणि पत्रकारिता
या क्षेत्रात डॉ. आंबेडकर यांनी कार्य केले. त्याच पाऊलावर पाऊल ठेवून डॉ. कराड शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत आहेत.”
या प्रसंगी माईर्स एमआयटीचे संस्थापकीय सहविश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील व एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के.क्षीरसागर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तसेच, विद्यार्थ्यांनी त्यांचा शिकण्याचा गुण धारण करावा असे म्हंटले.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू प्रा. डी.पी. आपटे, सचिव डॉ. प्रवीण दवे, अभय बिरारी, इंजीनियरिंग कॉलेजचे अधिष्ठाता प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर, प्रा.डॉ. सायली गणकर व अन्य उपस्थित होते.