पुणे: “संगीत थेरपी विकारांपासून दूर नेण्यास मदत करते. तसेच व्यक्तीचा स्वभाव, प्रकृती आणि समस्ये नुसार संगीत रचून त्याचे आजार बरे केले जातात. त्यामुळे भारतात आता डॉक्टर वर्गात ही उपचार पध्दती मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे” असे प्रतिपादन बंगलोर येथील इंडियन म्यूजिक थेरपी असोसिएशनचे संस्थापक डॉ. टी.व्ही.साईराम यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि बंगलोर येथील इंडियन म्यूजिक थेरपी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘म्यूजिक अँड हिलींग थेरपी’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी बासरी वादक आणि संगीतकार मिलिंद दाते, विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड ढाकणे, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.एस.परशूरामन, विद्यापीठाच्या फाइन आर्टस, लिबरल आर्टस, मास मीडिया अॅण्ड जर्नालिज्मच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा पाराशर हे उपस्थित होते.
डॉ. टी.व्ही.साईराम म्हणाले,“ संगीताचा प्रभाव खूप खोलवर जातो. ते नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलू शकते. संगीत स्वराच्या लहरीमुळे मन प्रसन्न होते तसेच मानसिक तणाव आणि कित्येक मानसिक आजार ही दूर करण्याची महत्वाची भूमिका पार पडतेे. मानव जसजसा संगीताच्या स्वर लहरीत बुडतो, तसे त्याचे लक्ष वेधले जाते. नंतर ती व्यक्ती तन व मनाने तणावमुक्त होते.”
मिलिंद दाते म्हणाले,“ संगीताचा ध्वनी आपल्यामध्ये आत्मचैतन्य व शक्ती निर्माण करतो. संगीत फक्त मानवाला नाही तर वृक्ष, प्राणी आणि निसर्ग यांनाही आकर्षीत करतात. भारतात संगीताची परंपरा खूपच प्राचीन आहे. परंतू संगीतातून आरोग्य ही म्यूजिक थेरेपी हवी तेवढी प्रचलित झालेली नाही. संगीत खूपच प्रभावी आहे आणि त्यांच्या माध्यमातून तणाव व मानसिक दुःखापासून सुटका करतो. तसेच, तन आणि मनाला प्रसन्न ठेवण्यात याची भूमिका महत्वाची आहे.”
डॉ. चंद्रकांत पांडव म्हणाले,“ संगीतातील रूप व ताल हे ईश्वर साधनेचे शेवटचे रूप आहे. संगीताच्या माध्यमातून जेव्हा आंतरिक शांती प्राप्त होईल तेव्हाच या सृष्टीवर विश्वशांती आपोआपच निर्माण होईल. बासरी वादन करतांना आम्हाला सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाची आठवण येते. कारण बासरी आणि कृष्ण यांचे नाते हे आत्मिक शांती देते.”
प्रा.ज्योती कराड ढाकणे म्हणाल्या, “एमआयटी संस्थेने विश्वशांती संगीत अॅकॅडमीची निर्मिती केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी भारतरत्न लता मंगेशकर आहेत. आज आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयाची वाटचाल करीत आहोत. त्याच प्रमाणे पखवाज वादक पद्मश्री शंकरबापू आपेगांवकर यांची संगीत साधनेची प्रेरणा घेऊन येथील विद्यार्थी शिकत आहेत.”
प्रा. डॉ. अनुराधा पाराशर यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. प्रीती जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कुलगुरू डॉ. एस. परशूरामन यांनी आभार मानले.