पुणे:“ मुलांचा शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी गुरूकुल शिक्षण पद्धती पुन्हा प्रचलित कशी करावी आणि वर्तमानकाळातील शिक्षणाचा समावेश त्यात कसा करता येईल यावर विचार होणे काळाची गरज आहे. तसेच अध्यात्म व ध्यानाच्या माध्यमातून नवी पिढी निर्माण करावी.” असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाचे सरचिटणीस अतुल कोठारी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत हेाते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी थायलंड येथील बोधीसत्व फाउंडेशनचे अध्यक्ष व जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू डॉ.बुध्दचरण दास, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एस.परशूरामण, प्र कुलगुरू व व्याख्यानमालाचे समन्वयक प्रा.डॉ. मिलिंद पांडे आणि प्र कुलगुरू प्रा.डॉ. आर.एम. चिटणीस हे उपस्थित होते.
अतुल कोठारी म्हणाले,“ स्वामी विवेकानंद यांनी म्हंटले होते की, पुन्हा जन्म घेतल्या नंतर मी त्या विश्वविद्यालयात शिकेन, जेथे मुलांना ध्यान शिकविले जाते. कारण ध्यान हे चारित्र्य निर्माण करण्याचा पाया आहे. त्यामुळे येथील शिक्षण पद्धतीमध्ये अध्यात्म म्हणजेच ध्यान शिकविले जाणे गरजेचे आहे. मुलांचा शिक्षणाबरोबरच आंतरिक आणि बाह्य मनाचा विकास करावा. त्यासाठी शारीरिक शिक्षण गरजेचे आहे. चंचल व पाण्यासारख्या मनाला नियंत्रित करण्यासाठी त्यांना सेवा, सत्संग, स्वाध्याय, संगीत, व्यायाम व प्राणायाम शिकवावे. अशाप्रकारे शिक्षण द्यावे की ज्यातून त्यांचा बौद्धिक विकास होईल व कोणताही निर्णय घेतांना ते चुकणार नाहीत.”
“आजच्या शिक्षण पद्धतीत विज्ञान शिकविले, जाते परंतू विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनच नाही. अशावेळेश त्यांना पर्यावरण, आरोग्य, खिलाडूवृत्ती सारख्या गोष्टी शिकवून त्यांची निर्णय क्षमता वाढवावी. मुलांपुढील आदर्श चरित्र निर्माण करण्यासाठी पालकांनी त्यांच्या पातळीवर येऊन त्यांच्याशी व्यवहार केल्यास ते अनुकरणातून शिक्षण घेतील.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ जगातील वेगवेगळ्या देशाची संस्कृती, परंपरा, भूगोल आणि इतिहास वेगळा असला तरी वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती ही एकच असली पाहिजे. आम्ही संस्थेत वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण पध्दतीचा अवलंबकरून शिक्षण दिले जात आहे. अध्यात्माचे शिक्षण हे विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. चारित्र्य आणि शिस्त या दोन गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनावर रूजविण्याचे कार्य आम्ही करीत आहोत.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात पुणे येथील आरएसएसचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख अनिरूद्ध देशपांडे यांनी भारतीय समाज जीवनातील अध्यात्मिकता या विषयावर विवेचन केले. ते म्हणाले की, सदैव आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने सत्कर्म करावे. दुसर्यांच्या विषयी जेव्हा कृतज्ञता व्यक्त कराल, तेव्हा असे समजावे की ही अध्यात्माची सुरूवात झाली. भारतीय संस्कृती ही चिरंतन आहे. याच संस्कृतीने आम्हाला दया, क्षमा आणि शांतीची शिकवण दिली आहे. हे सूत्र लक्षात ठेवले तर आपल्या जीवनात आनंदाचा झरा वाहेल आणि हाच झरा समाजातील एकतेसाठी महत्वपूर्ण कार्य करेल.
पाँडिचेरी येथील श्री अरबिंदो आश्रमाचे शास्त्रज्ञ, शिक्षक आणि विद्वान श्री. श्रध्दाळू रानडे म्हणाले, मनन, चिंतन व निदिध्यास या पायर्या पायर्यांच्या मार्गाने ज्ञान हदयात ठसत जाते. केवळ वरवरचे पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नाही. शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांकडे आत्मीयतेने पाहून आपल्याजवळील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचविले जाईल. याची काळजी घ्यावी. अशा तर्हेने एकंदरीत सर्व समाजातील विद्येचा विकास होईल.
प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. गौतम बापट ने सूत्रसंचालन किया. प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी आभार मानले.
एकाग्रता शिक्षण हे शिक्षणाचा मुळ आधारः
स्वातंत्र्य नंतर भारत सरकारने शिक्षणाउन्नतीसाठी अनेक आयोगांची स्थापना करण्यात आली. परंतू, त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा हवा तसा उंचावलेला नाही. त्या स्थानिक पातळीवरून शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी केली तर दर्जेदार शिक्षणाची दारे उघडली जातील. एकाग्रता आणि समग्र विकासाचे शिक्षण हे शाळा व महाविद्यालयीन स्तरावर दिल्यास सर्वगुण संपन्न असा विद्यार्थी निर्माण होईल.