२४व्या संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प
पुणे: “ माहित तंत्रज्ञानाचा विकास वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आज विद्यार्थ्याकडे ज्ञानाचे भांडार आहे. त्यांच्या मनामध्ये नव नवीन कल्पना येतात प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच नव निर्मिती होऊ शकते.” असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाचे चीफ इनोव्हेशन अधिकारी डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत हेाते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू व व्याख्यानमालाचे समन्वयक प्रा.डॉ. मिलिंद पांडे , प्र कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे व माईर्स एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल.के. क्षीरसागर हे उपस्थित होते.
डॉ. अभय जेरे म्हणाले,“आम्ही भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमधील नव नवीन कल्पनांतील सादर होणार्या प्रकल्पांना आयोजित करण्यास सुरूवात केली. त्यातून फार मोठे परिणाम हाती आले. एखादी व्यक्ती आलेल्या संकटांमुळे खचून न जाता नवे विश्व उभे करते. ही एक प्रेरणादायी घटना आहे. अशाच गोष्टी आपल्या समाजात आजू बाजूला घडत असतात. अशा प्रकारच्या घटनांची नोंद घेऊन ते सुद्धा नव नव्या गोष्टी करू पहतात. पण आपल्या कडील नकारात्मक दृष्टीकोनामुळे त्यांना कोंब फूटताच चिरडले जाते. त्यामुळे देशाची सुद्धा हानी होते. असे अनेक विद्यार्थी वैफल्यग्रस्त होतात. ते मोठे झाल्यावर पुढच्या पिढीलासुद्धा विरोध करतात.”
“ पाश्चात्य देशांमध्ये बुध्दिमान विद्यार्थी हेरून त्यांना व्यासपीठ देण्याचा पायंडा तेथे रूजलेला आहे. हेच विद्यार्थी पुढे मोठे शास्त्रज्ञ होतात. व त्यांच्या कथा आपण कौतुकाने वाचतो. त्यातून धडा घेऊन आपल्या कडील शिक्षण पध्दती बदलावी.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“विद्यार्थ्यांंनी सामाजिक कल्याणासाठी संशोधन व सृजनशीलतेवर भर देण्याचा प्रयत्न करावा. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुध्दिमत्ता आहे. अनेक नवनवीन कल्पना आहेत. त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील कला गुणांना वाव द्यावा व नवे प्रकल्प निर्माण करावे असा आम्ही प्रयत्न करतो.”
ततपूर्वी सकाळच्या सत्रात नवी दिल्ली येथील जामिया हमदर्द विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सय्यद एहतेशाम हसनान, थायलंड येथील बोधीसत्व फाउंडेशनचे अध्यक्ष व जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू डॉ.बुध्दचरण दास, जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू व व्याख्यानमालाचे समन्वयक प्रा.डॉ. मिलिंद पांडे एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस हे उपस्थित होते.
डॉ. सय्यद एहतेशाम हसनान म्हणाले, “ वर्तमान काळात तंत्रज्ञानाच्या दिशेनेच आमची मानसिकता आणि विकास होत आहे. डेटा कलेक्ट करणे, माहितीचे आदान प्रदान आणि स्मार्ट फोनचा वापर सध्या भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. तंत्रज्ञान जसे चांगले आहे तसे त्याचे दुष्पपरिणाम सुध्दा होतांना दिसतात. कारण यामुळे स्वतःची माहिती संपूर्ण समाजाल कळत आहे. तंत्रज्ञानाजवळ सर्व काही आहे परंतू, आत्मा, ध्यान, धर्म, मूल्य, परंपरा, भावना, सृजनात्मकता आणि प्रेम नाही. अशावेळी मनुष्याला या युगात सुखी रहावयाचे असेल तर सदैव आनंदी राहावे, दुसर्यांशी तुुलना करू नये, नकारात्मक भावना आणु नये, सदैव सकारात्मक विचारसरणी ठेवावी, माझ्यामुळे कोणी दुखी होणार नाही आणि आपल्या दुखांचे निराकरण स्वतःच करावे. असे वागण्याची गरज आहे.”
डॉ. एस.एम.पठाण म्हणाले,“ मनुष्य जेव्हा शैक्षणिक प्रगती करतो त्यावेळेस त्याचा विकास होतो तसेच सामाजिक मूल्यांना तो आपल्यात उतरवीत असतो. जेव्हा प्रत्येक व्यक्ती सामाजिक मूल्यांवर अधिक जोर देईल त्यावेळेस विश्वशांती येण्यास वेळ लागणार नाही. शिक्षण म्हणजे चारित्र्य संवर्धन असते. ज्यामुळे मानवाचा विकास होतो. वर्तमानकाळात वाढत जाणार्या हिंसक समाजासाठी मूल्यवर्धित शिक्षणाची गरज मोठ्या प्रमाणात आहे.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“संगणकीय युगात माहिती, डेटा कलेक्शन हे सर्वात महत्वपूर्ण असल्याने मानवाचा विकास गतीने झाला आहे. आता त्याच विकासाच्या माध्यमातून आम्हाला मनः शांती कशी मिळू शकेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सदैव आनंदी राहण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे समाजात मूल्यवर्धित शिक्षणाची गरज आहे.”
निरज सनन म्हणाले, “जीवन बदलण्यासाठी आपली जीवन पद्धती बदलणे गरजेचे आहे. स्वतःला शांती हवी असल तर ती दोन पद्धतीने येऊ शकते. एक प्रोफेशनल आणि स्वतःच्या माध्यमातून. स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मानसिक तंदुरूस्ती चांगली ठेवावी लागेल. तसेच, परिवर्तनीय दुनिये बरोबरच आपल्याला चालावे लागेल. वर्तमान काळ हा यंत्रमय झाला आहे.”
त्यानंतर श्रीरंग बापट आणि प्रा.डी.पी. आपटे यांनी वेगवेगळ्या विषयावर आपले विचार मांडले.
डॉ. मिलिंद पांडे यांनी स्वागत पर भाषण केले.
प्रा.अनघा खरे यांनी सूत्रसंचालन केल. प्रा.डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.