पुणे: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्ुत विद्यामानेे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२३ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप विश्वरूपदर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे आज दुपारी १२.०० वाजता लाखो वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील लाखो वारकर्यांनी गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीेचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गजर केला. या वेळी विश्वरुप दर्शनमंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केद्राच्या वतीने लाखो वारकर्यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याच्या कीर्तनात म्हणाले,“आपल्या मधील आशा हेच सर्व दुःखाचे मुळ कारण आहे. त्यामुळे प्रत्येकाने आशा सोडली तर आपल्या जीवनात सुख व समाधान मिळू शकते. सृष्टीमध्ये त्रास देणारा कोणताही धर्म असू शकत नाही. धर्म म्हणजे स्वतःचे कर्तव्य आहे. बुध्दिला देव समजले की आपल्याला दुुःखच मिळते. म्हणून प्रत्येकाने ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी नतमस्तक व्हावे.”
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकर्यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. हा उपक्रम यापुढेही चढत्या श्रेणीने चालू राहील.
या समारंभासाठी थाइलँडचे बोधीसत्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बुध्दचरण दास, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे प्रमुख प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, ह.भ.प. श्री. तुळशीराम दा. कराड, सौ उषा विश्वनाथ कराड, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड चाटे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, ह.भ.प. श्री. नारायण महाराज उत्तरेश्वर -पिंपरीकर व एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.
माऊलीच्या मंदिरात यावेळी खूपच गर्दी असते. त्यामुळे वारकर्यांना दर्शन घेता येत नाही. यासाठी, विश्वरूप दर्शन मंचावरून संजीवन समाधी सोहळ्याचे दर्शन लाखो वारकर्यांना घडविण्यात आले.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी ईश्वरीय शक्ती ही महत्वाची असते. संतश्री ज्ञानेश्वर महाराजांनी अंतिम सत्य व ज्ञानाची पूजा करून गीतेवर भाष्य करून संपूर्ण मानव जातीचे कल्याण केले. संतश्री ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानाचे शिक्षण दिले आहे. तेच शिक्षण आता संपूर्ण जगासमोर मांडण्यास सुरूवात झाली आहे.”
समाधीसोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रवचनात संत महिमा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.श्री.बापूसाहेब मोरे-देहूकर यांचे प्रवचन झाले.
ह.भ.प.श्री बाबा महाराज सातारकर यांचे नातू ह.भ.प. श्री चिन्मय महाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका ह.भ.प. श्रीमती गोदावरीताई मुुंडे, ह.भ.प. श्री. रमेशबुवा सेनगांवकर, ह.भ.प.श्री काशिरामबुवा इडोळीकर व ह.भ.प. श्री. दिगंबरबुवा कुटे यांचा सांप्रदायिक संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.
या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरणी आपली सेवा रूजू केली. यापुढेही वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम या विश्वरूप दर्शन मंचावर आयोजित करण्यात येणार आहेत.