पुणे, दि. 22 नोव्हेंबर : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र आळंदी येथे उडुपी, कर्नाटक येथील पेजावर मठाचे अधोक्षज ज्ञानमठाधिपती ज्ञानब्रह्मर्षि परमपूज्य श्री श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी महाराज आणि जळगांव येथील संत श्री सखाराम महाराज संस्थान, अंमळनेरचे 11वे विद्यमान सत्पुरूष गुरूवर्य ह.भ.प.श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर यांना समर्पित जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जागतिक सहिष्णुता सप्ताह आणि तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून कार्तिकी एकादशीच्या दिवशी, शनिवार दि.23 नोव्हेंबर 2019 रोजी सायं. 6.00 वा. हा पुरस्कार प्रदान समारंभ लाखों वारकर्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
हा पुरस्कार जगप्रसिद्ध संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
अल्पसा परिचयः
1ः ज्ञानब्रह्मर्षि श्री श्री विश्वेशतीथ स्वामीजी ः
भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतिक, एक अत्यंत ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले श्री श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी हे उडुपी कर्नाटक येथील पेजावर श्री अधोक्षज मठाचे ज्ञानमठाधिपती आहेत. त्याग व समर्पणाचे ते प्रत्यक्ष स्वरूप आहेत. अत्यंत तरूण वयातच त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली. एक वेदशास्त्र संपन्न व विद्वत्तापूर्ण व्यत्किमत्व अशी स्वामीजींची ओळख आहे. सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी अतुलनीय कार्य केले आहे. आज वयाच्या नव्वदीत असताना देखील ते सतत कार्यशील असतात.
2ः ह.भ.प.श्री प्रसाद महाराज अंमळनेरकरः
भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतिक ह.भ.प.श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर हे जळगांव येथील संत श्री सखाराम महाराज संस्थानचे 11वे विद्यमान सत्पुरूष गुरूवर्य आहेत. सखाराम महाराज संस्थानची परंपरा ते चालवित आहेत. त्याग व समर्पणाचे ते प्रत्यक्ष स्वरूप आहेत. ते पंढरपुर येथील विठ्ठल रूक्मिण मंदीर समितीचे प्रमुख सल्लागार आहेत. तसेच अमळनेर येथे वेदपाठशाळा आणि वारकरी शिक्षण संस्था चालवितात. येथेच धर्माथ दवाखाना चालवितात. त्याचप्रमाणे समाजातिल गरजू, दिव्यांग, नेत्रहिन लोकांना साहित्य वाटप, वेगवेगळ्या प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. याप्रकारे ते अध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक सेवा करून मानव उत्थानाचे कार्य करीत आहेत. हिंदू मुस्लिम ऐक्येसाठी ते अविरत कार्य करीत आहेत.