पुणे, दि. १६ : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे,भारतच्या वतीने दिला जाणाराया वर्षीचा २०१९ सालचा एक अत्यंत प्रतिष्ठेचा, ऐतिहासिक स्वरूपाचा आणि नोबेल शांतता पारितोषिकाच्या धर्तीवर दिला जाणारा ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार-२०१९’ (Philosopher Saint Shree Dnyaneshwara World Peace Prize-२०१९) जगप्रसिध्द तत्वज्ञ, विद्वान, विचारवंत, संस्कृतचे गाढे अभ्यासक, थोर दूरदर्शी व संवेदनशील राजकारणी व माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण ‘डॉ. करण सिंग’ यांना जाहीर करण्यात आला आहे.
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलीची सुवर्णजडित मूर्ती, माऊलींची प्रतिमा असलेले सुवर्णपदक, सन्मानपत्र, शाल व सव्वापाच लक्ष रूपये (रु.५,२५,०००/-) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार प्रदान समारंभ धर्म, विज्ञान आणि अध्यात्माच्या पाचव्या जागतिक परिषदेचे औचित्य साधून गुरुवार, दि. ३ ऑक्टोंबर २०१९ रोजी जगातील सर्वात मोठ्या घुमटातील ‘तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्व शांती सभागृह’, विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे, भारत येथे प्रदान करण्यात येणार आहे.
भारताय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, संस्कृतचे विद्वान असलेले आणि जम्मू काश्मीरचे पूर्व महाराजा हरी सिंह आणि महाराणी तारा देवीचे वारस असलेले डॉ. करण सिंग यांनी केंद्रीय मंडळात असतांना अनेक महत्वपूर्ण पदांवर कार्य केले आहे. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात पर्यटन व नागरी उड्डाण मंत्री, आरोग्य व कुटुंब नियोजन मंत्री, शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अशी पदे भूषविली आहेत. त्यांनी विज्ञान, संस्कृती आणि चेतना आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन केली आहे.
डॉ. करण सिंग यांनी इंग्रजी भाषेमध्ये राज्यशास्त्र, तत्वज्ञानविषयक निबंध, प्रवास आणि कविता यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या वन मॅन्स वर्ल्ड आणि हिंदू धर्मावर लिहिलेल्या निबंधांचे महत्वपूर्ण संग्रह खूप कौतुकास्पद म्हणावे लागेल. त्यांनी मातृभाषा डोगरीमध्येकाही भक्तीगीतेही लिहीली. भारतीय संस्कृती व परंपरेची सखोल माहिती, पाश्चात्य साहित्य आणि सभ्यता यांचे तपशीलवार ज्ञान असल्यामुळे त्यांना भारतात व परदेशात प्रतिष्ठित विचारवंत आणि नेता म्हणून ओळखले जाते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे डॉ. करण सिंग हे अनेक वर्ष जम्मू-काश्मीर विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलाधिपती म्हणून कार्यरत होते.
यापूर्वी हा प्रतिष्ठेचा तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्व शांती पुरस्कार आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्री श्री रवीशंकरजी, आदरणीय माता श्री अमृतानंदमयी देवी, व जपानच्या गोई पीस फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. हिरू सायोंजी – श्रीमती मासामी सायोंजी, साधू वासवानी मिशनचे आध्यात्मिक गुरू पूज्य दादा जे. पी. वासवानी, अक्षरधामचे प्रमुख स्वामीजी व मानव एकता मिशन’चे संस्थापक-अध्यक्ष, महायोगी गुरू श्री एम (श्री मुमताज अली खान), जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. फ्रिजॉफ काप्रा आणि अमेरिकेतील मॉर्मन पंथाचे अध्यक्ष, मार्गदर्शक, गुरु आणि द चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स, ‘एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन’ यांना प्रदान करण्यात आला आहे. .
या ऐतिहासिक जागतिक शांतता पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण मा. डॉ. रघुनाथ माशेलकर असून, जगप्रसिद्ध संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि वेदांचे व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक वेदब्रह्म ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे यांचा या समितीत समावेश आहे.
अशी माहिती जागतिक शांतता समितीचे कार्याध्यक्ष व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी दिली