पुणे-जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून १०० जलाशयांची निर्मिती करण्याचा संकल्प एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी जाहीर केला आहे.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्र दाहक दुष्काळाचा अनुभव घेत आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणातील साठा आता जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. आणखी दोन महिने पाऊस पडला नाही, तर महाराष्ट्राची स्थिती अतिशय भयावह होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्वतरांगाचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दर्याखोर्यांचा उपयोग करून, कृत्रिम जलाशये निर्माण केल्यास राज्याच्या दृष्टीने ते अतिशय लाभदायक ठरू शकेल आणि मुख्य म्हणजे आपला पुणे जिल्हा हा तलावांचा / जलाशयांचा जिल्हा (Lake District) म्हणून उदयास येईल, याचा विचार आणि गरज लक्षात घेऊन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने या विषयातील तज्ञ, महाराष्ट्र शासनाच्या तसेच जनसामान्यांच्या सहभागाने सदरील प्रकल्पाचा संकल्प सोडला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या नावाने, तर सिंहगडाच्या पायथ्याशी नरवीर तानाजीच्या नावाने हे भव्य व सुंदर तलाव बांधण्याचा संकल्प केला आहे.
या प्रकल्पासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामध्ये जलतज्ञ डॉ. दिनकरराव मोरे, तेर संस्थेचे अध्यक्ष आणि पर्यावरण क्षेत्रातील नोबेल विजेते डॉ. राजेंद्र शेंडे, जलतज्ञ श्री. शरद मांडे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव आणि स्थापत्त्य अभियांत्रिकी तज्ञ डॉ. मंगेश तु. कराड यांच्यासहित अनेक जलतज्ञ आणि पर्यावरण तज्ञांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे.
येत्या १५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, या विषयातील तज्ञ मंडळींशी आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून या प्रकल्पाबाबतचा प्राथमिक प्रारूप आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.