पुणे-पुणे जिल्ह्यातील आळंदी परीसरात जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. धर्मांतरासाठी पैशांचे आमिष दाखवण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत पोलिसांनी सांगितले कि,’ प्रसाद भाऊसाहेब साळुंखे (वय 25 रा. मरकळ,पुणे) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार प्रदीप मधुकर वाघमारे (चऱ्होली), प्रशांत मधुकर वाघमारे (वय 30), रोनक शैलेश शिंदे (वय 18 रा.भोसरी), अशोक मुकेश पांढरे (वय 19 भोसरी), मुकेश जयकुमार विश्वकर्मा (वय 25 रा.भोसरी), लक्ष्मण श्रीरंग नायडू (वय 35 रा.भोसरी), म्यूंगी व्युयुंग वुन (वय 38 रा. भोसरी), ज्युईल वोमन युन (वय 36), ईशा भाऊसाहेब साळवे (वय 19) या तीन महिला व एक अल्पवयीन मुलगी अशा एकूण 14 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार ,दहा दिवसांपूर्वी दिघी आणि आळंदी परिसरात येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचं लाल सरबत पाजून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर आता सक्तीच्या धर्मांतरासाठी पैसे देऊन तक्रारदार यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार रविवारी आळंदी जवळील मरकळ गावात उघडकीस आला आहे.
दरम्यान, धर्मांतरबंदी कायद्यासाठी नुकतेच 15 जानेवारी रोजी आळंदीत जाहीर मोर्चा देखील काढण्यात आला होता. यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी सदर भागात धर्मांतराची घटना पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी हे फिर्यादी यांच्या गावातील लोकांच्या घरासमोर जाऊन ‘तुम्ही बायबल वाचता का, चर्चमध्ये या, आम्ही तुम्हाला धंद्याला आर्थिक मदत करू असे आमिष दाखवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत पुढील तपास आळंदी पोलिस करत आहे.