पुणे- दौंड तालुक्यातील गुऱ्हाळे चालविणाऱ्याना प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची साथ मिळत असल्याने त्यांनी शेतकऱ्यांची लुट चालविली असून अनेक नियमबाह्य कृतींचा सपाटा लावल्याचा आरोप करत शेतकरी राजा संघर्ष कृती समितीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. या समितीचे राजाभाऊ तांबे यांनी उपोषण सुरु असताना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले ,आज महात्मा गांधी जयंती च्या दिवशी आम्ही हे उपोषण करत आहोत आणि जिल्हाधिकारी यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधतो आहोत. शेतकऱ्यांना येथील गुऱ्हाळ वाले मनमानेल त्या पद्धतीने कमी पैसे देवून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. या शेतकऱ्यांना किमान रुपये २९०० प्रती टन आणि त्यापुढेच भाव मिळाला पाहिजे ,येथील गुऱ्हाळ घरांवर जळण म्हणून प्लास्टिक,रबर, गुरांची कातडी, कोरोनाचे पीपीई कीट, मेडिकल वेस्टेज ,चपला अशे अविघातक पदार्थ वापरले जातात जे प्रदूषण कायद्याने गंभीर गुन्हे आहेत .गुल निर्मिती साठी वापरले जाणारे घातक केमिकल्स ,रसायन,रांगोळी ,आळ्या पडलेला गुल,निकृष्ट लॉलीपॉप,खराब झालेले चोकलेट,वापरले जातात अशा लोकांवर तात्काळ भा रतीय दंड संविधानातील तरतुदीप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. दौंड तालुक्यात अनेकांकडे 1 नाहीतर 2 ते ३ गुऱ्हाळे आहेत.लाईट एका साठी घेतली जाते आणि प्रत्यक्षात अन्य गुऱ्हाळाना ती बेकायदा दिली जाते.महावितरणाच्या अधिकार्यांशी त्यासाठी संगनमत केले जाते.गुऱ्हांळावरील मजुरांना वेठबिगारी प्रमाणे राबविले जाते.त्यांच्या साठी शौचालये उभारावीत ,त्यांना किमान वेतन मिळावे, प्रदूषण रोखण्यासाठी गुऱ्हांळानी उंच चिमणीचा वापर करावा .प्रत्येक गुऱ्हांळ मालकाने प्रती वर्षे १० फुट उंचीची २०० झाडे लावावीत अशा मागण्या आपण जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केल्याचे राजाभाऊ तांबे यांनी सांगितले.