पुणे- शहरातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील पदाधिकारी आणि पोलिसांकडून गणेश मंडळांना यंदा मंदिरांतच साजरा करण्याचे आवाहन केले जात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र ज्या मंडळांकडे मंदिरच नाही अशा मंडळांचा प्रश्न उपस्थित करीत त्यांना मंडप घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. शहरातील अनेक मानाची मंडळे परंपरा मोडून मंडपाऐवजी मंदिरातच उत्सव साजरा करण्यासाठी तयारी करत असताना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेमुळे पुन्हा या विषयावर वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे महापौरांनी घरच्या घरी गणपती विसर्जन करावे असे घरगुती गणपती स्थापना करणाऱ्यांना केलेलं आवाहन आणि त्यावर कॉंग्रेसचे आबा बागुल यांनी उपस्थित केलेली विधाने वादाची ठरत असताना यंदा गणेशोत्सवाच्या काळात तमाम पुणेकर आणि कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहाला आवर मात्र घालावाच लागणार आहे हे स्पष्ट आहे.
शहरातील करोनाची साथ अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करतानाच रस्त्यावर मंडप टाकण्याऐवजी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंदिरांमध्येच प्राणप्रतिष्ठा करण्याचा सल्ला महापालिकेचे पदाधिकारी आणि पोलिसांनी दिला आहे. शहरातील बहुतेक मानाच्या मंडळांमध्ये त्यावरून एकमत असल्याचे चित्र दिसून येत असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदिरे नसलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप घालण्याची परवानगी देण्याची विनंती पोलिस आयुक्तांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे. सरकारने निश्चित केलेल्या सर्व नियमांसह मंडप घालण्याची परवानगी दिली जावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे.
गेल्या पाच महिन्यांमध्ये प्रत्येक धर्माच्या सण-उत्सवाच्या वेळी प्रसंगानुरूप मार्ग काढण्यात आला आहे. गणेशोत्सव एक-दोन दिवस नाही, तर दहा दिवसांचा असतो आणि तो सामूहिक स्वरूपात साजरा केला जातो. स्वतःचे गणेश मंदिर उपलब्ध असल्यास तेथेच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. परंतु, शहरातील अनेक मंडळांकडे स्वतःची जागा अथवा मंदिर नसल्याने अशा मोजक्या मंडळांना मंडप घालण्याची परवानगी देऊन त्यांच्या भावनांचा आदर केला जावा, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.