राज्य मंत्रिमंडळाचा गेले 38 दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी राजभवनवर पार पडला. पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. चंद्रकांत पाटील यांची निष्ठावान भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय तर अमित शाह यांचे विश्वासू म्हणून ओळख आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते कॅबीनेट मंत्रीपदापर्यंतच चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणादायी राजकीय प्रवासावर नजर…
चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापूरचे असले तरी त्यांचे वडील गिरणी कामगार असल्याने बालपण मुंबईतल्या चाळीत गेले. तर शालेय शिक्षण राजा शिवाजी विद्यालय दादर आणि महाविद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ कॉलेज येथे पूर्ण झाले. याच काळात त्यांनी घर सांभाळून संघटनेसाठी पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सन 1980 मध्ये विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरु केले. अभाविपमध्ये कार्यरत असताना त्यांना यशवंतराव केळकर यांचे मार्गदर्शन लाभले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले.
सन 1980 ते 1982 या काळात त्यांच्यावर जळगाव जिल्ह्याचे जिल्हा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर दोन वर्षातच, सन 1982 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. हे काम करत असताना त्यांनी जळगांव आणि उत्तर महाराष्ट्रात समाजातील विविध क्षेत्रामध्ये आपला संपर्क वाढवला. 1984 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटन मंत्री म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही महाराष्ट्रातील पहिली संघटना होती. या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रूप खऱ्या अर्थाने बदलण्यास सुरुवात झाली.
1990 मध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी तरुणांची ‘गर्जना’ ही संघटना सुरु केली. यानंतर मात्र, वर्ष 1993 मध्ये त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम थांबवले आणि आपल्या मूळ गावी (खानापूर, ता. भुदरगड (गारगोटी) जि. कोल्हापूर) येथे स्थायिक झाले. या भागात पहिले काजू प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र त्यांनी सुरु केले. त्याचबरोबर त्यांनी TELEMATIC या नावाने टेलीकॉम क्षेत्रातील व्यवसाय कोल्हापूर येथे सुरु केला. शिवाय, त्यांनी ‘विद्या प्रबोधिनी’ या नावानी कोल्हापुरात खूप मोठे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले होते. सन 1995 ते 1999 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोल्हापूर विभागाचे ‘सहकार्यवाह’ म्हणून काम पहिले.
राजकारणात सक्रिय
यानंतर राजकीय जीवनात प्रवेश करून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. सन 2004-2007 या कालावधीत त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख अशी जबाबदारी सोपविण्यात आली. 2008 मध्ये पहिल्यांदाच ते पुणे विद्यापीठातील पुणे विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला. सन 2014 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन होत असताना, या पहिल्या मंत्रीमंडळात त्यांना मंत्री होण्याचा बहुमान मिळाला.
मंत्रिमंडळात समावेशानंतर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला. सार्वजानिक बांधकाम विभाग वगळून इतर दोन विभागांची जबाबदारी चंद्रकांत दादांनी ऑक्टोबर 2016 पर्यंत समर्थपणे सांभाळली. यानंतर त्यांच्याकडे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील हे महत्त्वाचे कॅबिनेट मंत्रीपद यशस्वीरीत्या सांभाळले आहेत. जुलै 2019 मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाली.