पुणे : खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीतील पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असून, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी (ता.13) चार धरणांमधील पाणीसाठ्यात सुमारे दीड अब्ज घनफूट (टीएमसी) ने वाढ झाली. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत सध्या 20.04 टीएमसी (66.58 टक्के) इतका पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी :
टेमघर 1.84 (49.50)
वरसगाव 8.07 (62.97)
पानशेत 8.15 (76.58)
खडकवासला 1.97 (100)
प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पुणे जिल्ह्यातील खडकवासला (1.97 टीएमसी), कळमोडी (1.51 टीएमसी) आणि वीर ही तीन धरणे (9.34 टीएमसी) पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खडकवासला धरणातून गुरुवारी सायंकाळी मुठा नदीतून 11 हजार 705 क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये गुरुवारी सायंकाळी एकूण 20.04 टीएमसी पाणीसाठा झाला असून, हे प्रमाण 68.73 टक्के इतके आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत 60 मिलिमीटर, वरसगाव 81, पानशेत धरणाच्या क्षेत्रात प्रत्येकी 82 मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रात सकाळपर्यंत 29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला प्रकल्पात गतवर्षी 13 ऑगस्टअखेर 29.15 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा होता. तो आज अखेर मात्र 65 टक्के आहे.