जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये हिरडा प्रक्रिया उद्योग होणार सुरु
श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा उत्पादक सहकारी संस्थेस समभाग खरेदीसाठी २६.६० लक्ष निधी मंजूर
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये हिरडा प्रक्रिया उद्योग लवकरच सुरु होणार आहे. कुकडेश्वर आदिवासी हिरडा उत्पादक सहकारी संस्थेस समभाग खरेदीसाठी २६.६० लक्ष निधीला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक संस्थेचे अध्यक्ष काळू शेळकंदे व आदिवासी नेते मारुती वायाळ यांनी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांची भेट घेऊन खानापूर, ता. जुन्नर येथील बंद अवस्थेत असलेला हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनावणे यांनी मंत्रालयात यासंदर्भात आदिवासी मंत्री अशोक उईके व प्रधान सचिवांची भेट घेऊन या प्रकल्पाची माहिती देत या प्रकल्पामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळ भागातील आदिवासी भागाला या प्रकल्पाची होणारी उपयुक्तता निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार हा उद्योग सुरु करण्याच्या पहिल्या प्रयत्नाला यश मिळाले असून सदर संस्थेला हिरडा उप्तादक आदिवासी शेतकऱ्यांकरिता समभाग खरेदी करण्यासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाद्वारे चालू वर्षांमध्ये (सन २०१९-२०) २६.६० लक्ष निधीला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. याबाबतचे राज्य शासनाचे आदिवासी विभागाचे मंजुरीपत्र ११ सप्टेंबर रोजीचे पत्र जिल्हाधिकारी पुणे व आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी घोडेगाव यांना कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.
माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, आदिवासी भागातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी स्वतः व जुन्नरचे आमदार शरद सोनावणे आम्ही कटिबद्ध आहोत. यासंदर्भात माझी नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरु असून याकरिता सुमारे १८ कोटी २४ लक्ष निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. यापैकी हिरडा प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी २ कोटींची तरतूद आवश्यक आहे. तर भविष्यातील आदिवासी समाजाला मिळणारे फायदे लक्षात घेऊन हिरड्या व्यतिरिक्त जांभूळ, आंबा, करवंदे आदींवरील प्रक्रियांकरिता ५० टन क्षमतेचे शीतगृह उभारणे, बाळ हिरडा गोळ्यांचा प्रकल्प उभारणे यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे.
मी व आमदार शरद सोनावणे हा प्रकल्प सुरु व्हावा यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. हा प्रकल्प मार्गी लागल्यास पुणे जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांना हक्काचा व्यवसाय कायमस्वरूपी उपलब्ध होईल असे प्रतिपादन यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.