पुणे-पुण्यातील टीव्ही -९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी शिवाजीनगर येथील जम्बो कोविड केअर रूग्णालयात निधन झाले आहे. या प्रकरणाचा अहवाल ससूनचे अधिष्ठाता यांच्या मार्फत सोमवारी येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील अनेक भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी रूग्णांना चांगली सुविधा दिली जात आहे. मात्र बुधवारी पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनानंतर
जम्बो रूग्णालयातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्या व्यक्तिला रुग्णालय चालविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या संबधितांना योग्य प्रकारे सुविधा देता येत नसतील. तर दुसर्या व्यक्तीची नेमणूक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, जम्बो रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांचे नातेवाईक उभे असतात. आतमधून कोणत्याही प्रकाराची माहिती दिली जात नाही. थेट रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उपचार घेणार्या रुग्णांची बाहेर असणार्या नातेवाईकांना माहिती मिळण्याच्या दृष्टीने बाहेर सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्क्रीनद्वारे माहिती देण्यात येणार आहे. यामुळे आतमध्ये रुग्ण सद्यस्थितीला काय करत आहे? त्यावर उपचार कसे केले जात आहेत? ही माहिती नातेवाईकांना उपलब्ध होणार आहे. ही सुविधा तातडीने देण्यात यावी, असे आदेश अधिकारी वर्गाला देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र अनेक ठिकाणी नागरीक मास्क वापरताना दिसत नाही. फिजिकल डिस्टंन्स पळताना दिसत नाही. तर काहींना आता वाटते की, मास्कची गरज नाही. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने मास्कचा वापर करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मास्क न घालणारे आणि कुठेही थुंकणार्यांवर कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.