‘इन्स्पायर टर्मिनेटर्स’ने पटकावले ‘बीएनआय क्वेस्ट २०२०’चे विजेतेपद
पुणे : ‘बीएनआय क्वेस्ट २०२०’ या क्रिकेट लीगचे विजेतेपद ‘इन्स्पायर टर्मिनेटर्स’ संघाने पटकावले, तर ‘विनर्स’ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बीएनआय पुणे ईस्ट-बीएनआय पुणे नॉर्थ, सुरतवाला बिझनेस ग्रुप व पीबीसीज एरो हब यांच्या संयुक्त विद्यमाने ही दोन दिवसांची स्पर्धा आयोजिली होती.
कोरेगाव पार्क येथील हॉटफूट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘इन्स्पायर टर्मिनेटर्स’ संघाने ‘विनर्स’ संघाला ६ गडी राखून पराभूत केले. विनर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गड्यांच्या बदल्यात ६८ धाव करून विजयासाठी इन्स्पायर टर्मिनेटर्सला ६९ धावांचे लक्ष्य दिले. टर्मिनेटर्सकडून वरद कर्वेने १८ चेंडूत ४९ धावा केल्या. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या वरदला सामनावीर किताब देण्यात आला. स्पर्धेत सर्वोकृष्ट महिला खेळाडू रुचिता जैन, सर्वोकृष्ट पुरुष खेळाडू स्वप्नील लोढा ठरले.
सर्वाधिक षटकार वासू पटेल यांनी, तर सर्वाधिक चौकार स्वप्नील लोढा यांनी लगावले. सर्वोकृष्ट गोलंदाज रुचिता जैन (७ विकेट), सर्वोत्कृष्ट पुरुष फलंदाज (२१८ रन) विवेक जयसिंघानिया ठरले. ‘फेयर प्ले’ किताब डेक्कन रॉयल्सने पटकवला. ‘बीएनआय’चे अतुल जोगळेकर, सुरतवाला बिझनेस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सुरतवाला, उपाध्यक्ष हितेंद्र सुरतवाला, सीएफओ दिगोंता दास, संयोजन समितीतील आनंद बेल्लड, सिद्धार्थ केसकर, प्रणवकुमार चित्ते, भूषण लोहिया, तृप्ती नानल, विनायक सणस, स्वाती वैद्य आदी उपस्थित होते. या स्पर्धेत ३२ संघ आणि ४०० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी दोन दिवसांत हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावली, असे संयोजकांनी नमूद केले.
आमदार सुनील टिंगरे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले. या क्रिकेट स्पर्धेत महिलांना खेळण्यासाठी प्रवृत्त केल्याचे कौतुक करून चंदू बोर्डे म्हणाले, आज महिला खेळाडू अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. भारतीय महिला संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहे. अशा गुणवान महिला खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे ठरतील.”
अतुल जोगळेकर म्हणाले, “या स्पर्धेमुळे अनेक उद्योजक एकत्र आले, दररोजच्या कामातून वेळ काढून स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे त्यांच्यातील ताणतणाव कमी होण्यास मदत झाली. तसेच सर्वजण एकत्र आल्यामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. या स्पर्धेत महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे महिलांना खेळाकडे पुन्हा वळण्याची अनोखी संधी मिळाली. स्पर्धेचे हे पहिले वर्ष होते. दरवर्षी ही स्पर्धा व्हावी.”