पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार भूमीमुक्त आंदोलनांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यानंतर ‘रिपाइं’च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. यावेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, निलेश आल्हाट, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, सोनाली लांडगे, शशिकला वाघमारे, मीनाताई गालटे, मोहन जगताप, सुंनाबी शेख, सुनीता वाघमारे, वसंत बनसोडे, मंगल राजगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत ५०० स्क्वेअर फुटाची घरे द्यावीत, झोपडपट्टी नियमित करावीत, झोपडपट्टी धारकांसाठी सरकारी व निमसरकारी योजना लागू करावी, भूमिहीनांना पाच एकर जमीन द्यावी, केंद्रातील व राज्यातील मागासवर्गीय अनुशेष भरावा, बेरोजगार भत्ता द्यावा, महिलांवरील अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
बाळासाहेब जानराव म्हणाले, “या मागण्यांसाठी राज्यभर आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे. शासनाने या मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. अन्यथा आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल.”