पुणे: “आईवडील नसलेल्या मुलांचे एक घर असायला हवे. त्यांना प्रेमाची उब मिळावी, त्यांना विश्वास द्यावा, याच विचारातून २१ वर्षे ‘सावली’ संस्थेमार्फत काम सुरु आहे. मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वयंप्रेरणेने केलेली परसबागेतील शेती; तसेच शिलाई काम आणि गोशाला यासारखे १७ प्रकल्प चालवले जातात. प्रेम या शब्दाला धरून काम केल्याने मुलांच्या मनातील हिंसेच्या भावनेची जागा अहिंसेने घेतली आहे,” अशी भावना सावली संस्थेचे संस्थापक नितेश बनसोडे यांनी व्यक्त केले.
शिक्षक भवन येथे वंचित विकास संस्थेतर्फे निर्मळ रानवारा मासिकाच्यावतीने नितेश बनसोडे यांना ‘रानवारा कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. दरवर्षी रानवारा लेखक-वाचक चळवळीचा एक भाग म्हणून वंचित विकास संस्थेतर्फे १९८८ सालापासून ‘रानवारा कृतज्ञता पुरस्कार’ दिला जातो. यावेळी ‘निर्मळ रानवारा’च्या वर्षभरातील अंकांमध्ये ज्यांचे लेखन, चित्रे प्रसिद्ध झाली. त्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘इंदिरा गोविंद पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
लहान मुलांसाठी अतिशय तळमळीने, प्रामाणिकपणे, प्रसिद्धीपासून दूर राहून काम करत आहेत, अशा व्यक्ती समाजासमोर याव्यात, त्यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने हा पुरस्कार दिला जातो. वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजय मर्लेच्या, नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, सुप्रिया कुलकर्णी, रांगोळीकार गणेश खरे, चैत्राली वाघ, मिलिंद वैद्य आणि विविध शाळांतील मुले आणि त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी ‘रानवारा’ मासिकाच्या ‘मुलांचे पान’ या सदरात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट कविता, गोष्टी, कोडी, चित्रे, लेख देणाऱ्या मुलांना प्रसिद्ध कवयित्री इंदिरा कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कै. इंदिरा गोविंद पुरस्कार देण्यात आला. या वेळी ‘निर्मळ रानवारा’ मासिकाचा फेब्रुवारीचा रांगोळीवरील अंक प्रकाशित करण्यात आला. रांगोळीकार हे देखील उत्तम करियर होऊ शकते असे गणेश खरे म्हणाले.
“संवाद साधने ही एक कला आहे आणि ती आपल्याला साध्य करता आली पाहिजे. वंचित विकास संस्था म्हणजे सामाजिक संस्थांनी एकमेकांना मदत करत वाटचाल केली पाहिजे याचे उत्तम उदाहरण आहे.” अशा भावना प्रकाश पारखी यांनी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन ‘रानवारा’च्या सल्लागार ललितगौरी डांगे यांनी केले, आणि ‘रानवारा’चे सल्लागार श्रीराम ओक यांनी इंदिरा गोविंद पुरस्काराची माहिती दिली.