पुणे : शौर्यदिनानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने शौर्यदिनानिमित्त १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये हा अभिवादन सोहळा पार पडणार आहे. त्याचे नियोजन आणि आखणी सुरु आहे.
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व प्रशासकीय पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात येत आहे. मागील वर्षी प्रशासनाकडून झालेल्या त्रुटीमुळे विविध गैरसोयी झाल्या. यंदा असा प्रकार होऊ नये, यासाठी पक्षाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सभेसाठी स्तंभ परिसरात मंडप उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीने नुकतीच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून विविध मागण्याच्या निवेदनाचे पत्र पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. यामध्ये भीमा कोरेगावच्या १ जानेवारीसाठीच्या कार्यक्रमास येणाऱ्या लाखोच्या जनसमुदायास वाहतूक व्यवस्था, स्तंभापर्यंत जाण्यासाठी पर्यायी वाहन व्यवस्था, वैद्यकिय पथके, पोलीस बंदोबस्त, स्तंभ परिसरातील सुशोभीकरण, पार्किंग, विविध कार्यक्रमासाठी जागेची उपलब्धता, वीज तसेच शौचालयाची व्यवस्था पुरविण्याविषयी चर्चा झाली आहे.
भविष्यात येथे येणाऱ्या जनसमुदायास सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्तंभ परिसराच्या विकास आराखड्यास तातडीने मंजुरी देऊन शासनाने किमान १०० कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा, स्तंभ परिसरातील १०० एकर जागेवर आरक्षण टाकावे, पेरणे ग्रामपंचायतीकडे स्तंभ परिसरात सुशोभिकरणाची जबाबदारी देऊन, त्यांना शासकीय पातळीवर निधी उपलब्ध करून दवावा. पुणे स्टेशन ते भीमा कोरेगाव आणि गुंजन चौक ते भीमा कोरेगाव अशी बस वाहतूक सेवा सुरु करावी, भीमा कोरेगावकडे येणारे रस्ते शक्यतो बंद न करता पर्यायी मार्गाने वळविण्यात यावीत आणि अत्यावश्यक सेवेसाठी एक स्वतंत्र मार्ग पुण्याच्या दिशेने तयार करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी कार्यक्रमास सात ते आठ लाख लोक येण्याची शक्यता आहे. गतवर्षी प्रशासनाने बऱ्याच उपाययोजना करूनही अलोट गर्दी उसळल्यामुळे सर्व यंत्रणा कोलमोडली होती. पाच ते सहा किलोमीटर पायी अंतर कापून नागरिकांचे आतोनात हाल झाले होते. तसेच अनेक नेत्यांना विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी ५ ते ६ तासाचा कालावधी लागला होता. पोलीस यंत्रणांनाही त्यांना मार्ग करून देता आला नाही. मुंबई-तळेगाव चाकणमार्गे भीमा कोरेगावकडे येणारी वाहतूक सेवा बंद केल्यामुळे व नगर रोडमार्गे भीमा कोरेगावकडे येणारी वाहने १० किलोमीटर अलीकडेच अडविल्यामुळे अभिवादन करण्यास येणाऱ्या या मार्गावरील नागरिकांचे अतोनात हाल झाले होते. रात्रीच्या वेळी वीज सेवा खंडित झाल्यामुळे सर्वत्र अंधार आणि भीतीचे वातावरण तयार झाले होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) पदाधिकाऱ्यांकडून ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. अयुब शेख, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, सचिव बाबुराव घाडगे आदी उपस्थित होते.