प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेतील आव्हाने स्वीकारावीत -अतुलचंद्र कुलकर्णी
पुणे : “विद्यार्थ्याच्या जडणघडणीत शिक्षकाचे योगदान मोलाचे असते. त्यामुळे शिक्षकाने सतत अद्ययावत राहायला हवे. प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमता, डेटा सायन्स आणि त्यामुळे येणारी आव्हाने स्वीकारून आवश्यक ते ज्ञान आत्मसात केले पाहिजे. आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत सतत बदल करत राहावेत. प्रगत ज्ञानदानाबरोबरच मूल्यांची शिकवणही विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक (सीआयडी) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजिलेल्या तीन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या उद्घाटनप्रसंगी अतुलचंद्र कुलकर्णी बोलत होते. प्रसंगी ‘सीडॅक’चे कार्यकारी संचालक कर्नल (निवृत्त) ए. के. नाथ, डेटा सायंटिस्ट सागर साबळे, उद्योग क्षेत्रातील समीर दलाल, कविता निर्णा, ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. संगीता जाधव आदी उपस्थित होते.
अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले, “जगभरात तंत्रज्ञानात सातत्याने विकास होत आहे. या विकसित तंत्रज्ञानामुळे नवी आव्हानेही उभे ठाकताहेत. सायबर सुरक्षा, डेटा सुरक्षाच्या समस्या गंभीर होत आहेत. त्याचा अभ्यास करून आपणही ‘अपडेट’ होणे गरजेचे आहे. इस्राइलसारख्या देशात संशोधन, तंत्रज्ञान विकासावर भर दिला जात असून, तिथे अकॅडमी, इंडस्ट्री आणि सरकार हे तिघेही एकत्रित काम करतात. त्यामुळे अकॅडमीने विकसित केलेली गोष्ट इंडस्ट्री त्यामध्ये अजून भर घालून विकसित करते आणि या दोन्हीला सरकारचे पाठबळ मिळते. हे सूत्र आपल्याकडेही लागू झाले, तर देशात नवीन तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होईल.” आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या युगास सुरुवात झाली असून, ते मानवी जीवनात आमूलाग्र बदल होण्यास कारणीभूत ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
ए. के. नाथ म्हणाले, “भारतीय वातावरणाला पोषक ठरेल, असे तंत्रज्ञान आवश्यक आहे परंतु तसे होताना दिसत नाही. त्यासाठी देशातच त्यावर संशोधन करणे गरजचे आहे. अनेक खाजगी संस्थांनी अश्या गोष्टीवर पुढे यायला हवे आणि विषयवार त्यांनी काम करणे आवश्यक आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे भवतालच्या अनेक गोष्टींवर आपण मात करत आहोत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविताना स्वतः ‘अपडेट’ आणि ‘अपग्रेड’ राहायला हवे.”
डॉ. संगीता जाधव, प्रा. रुपाली बगाटे, प्रा. अपर्णा जोशी यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. सूत्रसंचलन अरुण चौहान, नभिषेक सिंग यांनी केले. निवृत्त ब्रिगेडियर अभय भट यांनी आभार मानले.