दातृत्वातूनच मिळतो जीवनाचा खरा आनंद-सच्चिदानंद सरस्वती
फिक्की फ्लो पुणेच्या वतीने मार्गदर्शन सत्र
पुणे : “मनुष्यजन्म हा मोठ्या मुश्किलीने मिळालेला असतो. आपल्या भौतिक गोष्टी ‘सेट’ करतानाच आपण ‘अपसेट’ होणार नाही, याची काळजी घ्यावी. शंभर हातानी कमावताना हजारो हाताने देण्यात आणि इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलावण्यातच जगण्याचा खरा आनंद मिळतो. शांती, समाधान हेच आपल्या जीवनाचे ध्येय असावे. नाहीतर, संपत्ती खूप, मात्र मनात दुःखाचे भांडार अशी स्थिती होते. जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आपल्यातील दातृत्व जपले पाहिजे,” असे प्रतिपादन ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष परमपूज्य स्वामी चिदानंद सरस्वती यांनी केले.
फेडरेशन ऑफ इंडियन चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज लेडीज ऑर्गनाइजेशन अर्थात फिक्की फ्लोच्या वतीने चिदानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मेरीयट हॉटेलमध्ये झालेल्या या सत्संगावेळी साध्वी भगवती सरस्वती, प्रसिद्ध सुफी गायक कैलास खेर, फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या चेअरपर्सन रितू प्रकाश छाब्रिया, उपाध्यक्षा अनिता सणस, सहसचिव पिंकी राजपाल, पायल राजपाल आदी उपस्थित होत्या.
स्वामी चिदानंद सरस्वती म्हणाले, “माझ्यासाठी काय यापेक्षा माझ्याकडून काय हा विचार केला पाहिजे. आजच्या सेल्फीच्या जगात निस्वार्थीपणे काम केले पाहिजे. आज अनेकजण थंडगार एसीमध्ये बसलेले असतात. मात्र, त्यांच्या आतमध्ये आगडोंब माजलेले असते. ही विरोधाभासी स्थिती बदलण्यासाठी आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती येणे गरजेचे आहे. त्यासाठी दुसऱ्याच्या आनंदाचा विचार आणि स्वतःच्या ‘पीआर’पेक्षा ‘प्यार’ करणे अधिक महत्वाचे आहे. ध्यानधारणा, प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसाद आणि आत्मचिंतन यावर भर दिल्यास जीवन आनंदमय होईल.”
साध्वी भगवती सरस्वती यांनीही मार्गदर्शन केले. कैलास खेर यांच्या गायनाने उपस्थितांना भारावून टाकले. आनंदी जीवनासाठी महिलांना मार्गदर्शन व्हावे, या हेतूने स्वामी चिदानंद सरस्वती यांचे मार्गदर्शन आयोजिल्याचे रितू प्रकाश छाब्रिया यांनी प्रास्ताविकात सांगितले. पायल राजपाल यांनी सूत्रसंचालन केले. पिंकी राजपाल यांनी आभार मानले.