लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलायला हवे- डॉ. मिलिंद वाटवे;
पुणे: ”स्त्री-पुरुष यांच्यातील संबंध व्यवस्थित समजून घेण्यासाठी जीवशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र माहित करून घेणे आवश्यक आहे. हे समजून घेतल्यास वैवाहिक जीवनात एकमेकांची समज चांगल्या प्रकारे होईल. लैंगिकतेविषयी खुलेपणे बोलणे, त्यामागचे विज्ञान जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजात घडत असलेल्या अनेक विकृती टळतील,” असे मत डॉ. मिलिंद वाटवे यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लैंगिक उत्क्रांती’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. वाटवे आणि डॉ. शंतनु अभ्यंकर सहभागी झाले होते. एस. एम. जोशी सभागृहामध्ये झालेल्या या चर्चासत्राला परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, सदस्य सुजाता बरगाले, सतीश सकटे, शशी भाटे, विनय र.र. आदी उपस्थित होते. लेखक जॅरेड डायमंड याच्या ‘व्हाय सेक्स इज फन’ या इंग्रजी पुस्तकाचा ‘संभोग का सुखाचा?’ हा मराठी अनुवाद डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी केला आहे. चर्चसत्रात त्यांनी पुस्तकाविषयी माहिती सांगितली.
डॉ. मिलिंद वाटवे म्हणाले, ”माणसाच्या उत्क्रांतीचे नियम प्राण्यांच्या अभ्यासातून समजतात. दोघांमध्ये फरक असला तरी प्राण्यांच्या अभ्यासातून आपले जीवन जास्त चांगले समजू शकते. आताच्या काळात उत्क्रांती विज्ञान खूप पुढे गेले आहे. मानवी लैंगिकतेचा अभ्यासही मोठ्या प्रमाणात होत आहे. समलैंगिकता या विषयाबद्दल आपल्या हाती निश्चित अशी माहिती आली नाही. प्राण्यामध्येही समलैंगिकता दिसते. पण तिचे स्वरूप वेगळे आहे. माणसांमध्ये अशी प्रकृती असणे हा गुन्हा नाही. परंतु या विषयाचा उलघडा पूर्णपणे झालेला नाही.”
डॉ. अभ्यंकर म्हणाले, ”लैंगिकतेकडे सजगतेने बघावे. तसेच शास्त्रीय पद्धतीने हा विषय समजावून घ्यावा. मग आपल्या वागणुकीबद्दल निर्णय घ्यावा. खूप आधीच्या काळात या विषयावर मोकळेपणाने बोलले; तसेच लिहले गेले. त्यांनतर आपल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीमुळे नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना वेगळ्या झाल्या. सध्याची परिस्थिती मात्र बदलत आहे. हा विषय उघडपणे चर्चिला जातो. स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधात स्त्रियांचा भावनिक सहभाग अधिक असतो, ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रजनन व्यवस्थेसंबधी विविध अडचणीना सामोरे जावे लागत आहे, त्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्विकार करावा.”
राजेंद्रकुमार सराफ म्हणाले,” भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्या गोष्टी योग्य बसतात याचा विचार करायला हवा. आदिवासी समाजापासून उच्च समाजापर्यंत स्त्री ला आपण योग्य साथीदार निवडण्याचा अधिकार दिला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकता आणि प्रजोत्पादना विषयी अनास्था निर्माण होत आहे यावर गांभीर्याने विचार करायला हवा.” डॉ. सुजाता बरगाले यांनी सूत्रसंचालन केले. दिपाली अकोलकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. सचिन सकटे यांनी आभार प्रदर्शन केले.