पूरसंकटाबाबत नागरिक, प्रशासन-राज्यकर्त्यांनी जागे व्हावे
मराठी विज्ञान परिषद आयोजित ‘शहरी पूरसमस्या : सत्य व मिथक’ या परिसंवादात मान्यवरांचा सूर
पुणे : “शहरी पूरसमस्येबाबत खबरदारी म्हणून बांधकामाकरीता नैसर्गिक प्रवाहावर होणारी आक्रमणे थांबवावीत. नदी स्वच्छता, तसेच मैला व्यवस्थापन याकडेही लक्ष द्यावे. लाल आणि निळ्या रेषा ठळक केल्या जाव्यात. पुराच्या संकटाची तीव्रता आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जावेत, याबाबत नागरिकांनी सजग होत प्रशासन आणि राज्यकर्त्यांना जागे करायला हवे,” असा सूर ‘शहरी पूरसमस्या : सत्य व मिथक’ या विषयावरील परिसंवादामध्ये निघाला. मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स यांच्या वतीने ‘शहरी पूरसमस्या : सत्य व मिथक’वर शिवाजीनगर येथील फिरोदिया सभागृह आयोजित परिसंवादात डॉ. दि. मा. मोरे, अभिजित घोरपडे, नंदकुमार वडनेरे, सतीश भिंगारे, प्रा. पराग सदगिर या मान्यवरांनी सहभाग घेतला होता. परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांनी परिसंवादाचे संचालन केले.
डॉ. दि. मा. मोरे म्हणाले, ”पावसाचे प्रमाण बदलले आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडतो. उशीरा पाऊस आणि अती पाऊस यामुळे खरिपाचे पीक धोक्यात येते. खरिपाच्या शेतीसाठी हा खूप प्रतिकूल पाऊस आहे. तसेच पुणे शहराच्या वाढिला कुठेतरी मर्यादा असणे आवश्यक आहे. शहराची जी नैसर्गिक स्थिती आहे, ती तेवढीच राहू देऊ द्यावी.” सतीश भिंगारे म्हणाले, “एकाच वेळी पडणारा धोधो पाऊस आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे पूरपरिस्थिती उद्भवली. पूर नियंत्रणासाठी स्वतंत्र विभाग हवा. ही नैसर्गिक आपत्ती असून, आपल्याला ते थांबवणे शक्य नाही. त्यावर नियंत्रण मिळणेच आपल्या हाती असून, त्यासाठी शहराची रचना करताना नद्या, नाले, ओढे ह्यात बदल होणार नाहीत याची काळजी घ्यावी.”
नंदकुमार वडनेरे म्हणाले, “यावर्षी कोयना खोऱ्यामध्ये प्रचंड पाऊस पडला. १२ दिवसात ४५७ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. निसर्गात मानवाने बदल केल्याने हे परिणाम दिसत आहेत. पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उसाची शेती हेदेखील यामागील कारण आहे. शहरातील नद्यानाले, ओढे बुजवु नयेत.” ”विकासाच्या नावाखाली नैसर्गिक प्रवाहावर अतिक्रमण होत आहे. पुण्याचे धोरणकर्ते आणि प्रशासन याला जबाबदार आहेत. नदी स्वच्छता, मैला व्यवस्थापन, स्वच्छता हे प्राधान्य क्रमाचे विषय आहेत. प्रशासन आणि राज्यकर्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, यासाठी नागरिकांनी त्यांच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे,” असे अभिजित घोरपडे म्हणाले.
डॉ. पराग सदगीर म्हणाले, “शहरीकरणामुळे भूमिवापरात फार मोठा बदल होतो आहे. अच्छिद्र पृष्ठ्भागामुळे पाणी मुरत नाही व ते वेगाने पुठे वाहत जाते. शहरी भागात मोठया प्रमाणात काँक्रीटीकरण आणि पेवरब्लॉक झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. अभियांत्रिकी महाविद्यालयात शहरी पूर समस्यावर संशोधन व्हावे. अभ्यासक्रमात वादळी पावसाचे नियोजन अंतर्भूत करावे.” प्रस्तावना राजेंद्रकुमार सराफ यांनी केली. उपाध्यक्षा डॉ. नीलिमा राजूरकर, सहसचिव डॉ. सचिन सकटे, वसंत शिंदे यांनी सहभागी मान्यवरांची ओळख करून दिली.