अध्यात्माच्या मार्गावर चालणे गरजेचे -डॉ. विकास आबनावे
अलख निरंजन’ विशेषांकाचे प्रकाशन
पुणे : “ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अस्तेय, अहिंसा, सत्य या पायावर अध्यात्म शास्त्राची निमिर्ती होते. खऱ्या अर्थाने नऊ दिवस उपवास केले, तर पचनसंस्थेला विश्रांती मिळते. यातून वाचलेल्या प्राणशक्तीतून शरीरातील नऊ विकार नाश पावतात. चित्तशुदधी, मनशुदधी आणि वाचाशुदधी होते. त्यामुळे अध्यात्माच्या मार्गावर चालणे गरजेचे आहे,” असे मत प्रसिद्ध व्याख्याते महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी व्यक्त केले.
नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने प्रकाशित ‘अलख निरंजन’ विशेषांकाचे प्रकाशन देवेन्द्रनाथ मठामध्ये झाले. अंकाचे हे ४५ वे वर्ष आहे. यावेळी कालभैरव मठ, पायधुणी मुंबई येथील श्री श्री श्री १००८ महंत पीर-योगी, भाईनाथ महाराज, नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टचे चेअरमन खालकर, कार्यकारी मंडळाचे सदस्य सामंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे आणि नाथभक्त मोठया संखेने उपस्थित होते.
डॉ. विकास आबनावे म्हणाले, “भारतीय संस्कृती अध्यात्माच्या पायावर उभी आहे. जगातील सर्व देश भारतीय संस्कृतीला मानतात. यामध्ये प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय जोड असलेली पाहायला मिळते. उपवास करण्यामागे एक शास्त्र आहे. आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण आपल्या धर्मातील चाली- रीती, रूढी-परंपरा जपल्या पाहिजेत.” संयोजन सुदीप प्रधान यांनी केले. या ‘अलख निरंजन’ अंकाला गेली अनेक वर्षे सर्वोत्कृष्ट अंकाचे पारितोषिक मिळत आहे.