किल्ल्यांच्या खरा इतिहास जाणण्यासाठी मोडीलिपी शिकणे गरजेचे : पांडुरंग बलकवडे
संदीप तापकीर लिखित ‘अपरिचित दुर्गांची सफर’ पुस्तकाचे ‘पीआयएलएफ’मध्ये प्रकाशन
पुणे : “किल्ल्यांचा संपूर्ण इतिहास असलेली पाच कोटी कागदपत्रे उपलब्ध आहेत. परंतु, ते सर्व मोडी लिपीत आहेत. त्यातील फक्त दोन लाख कागदपत्रे वाचून झाली असतील. त्यामुळे अजूनही माहित नसेलला इतिहास समोर येणे बाकी आहे. किल्ल्यांचा हा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी इतिहासप्रेमींनी, अभ्यासकांनी मोडी लिपी शिकणे गरजेचे आहे. मोडी लिपी येणाऱ्यांची संख्या वाढली तर हजारो किल्ल्यांचा इतिहास समाजातील प्रत्येकापर्यंत पोहचू शकेल,” असे मत जेष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांची मुलाखत लेखक संदिप तापकीर यांनी घेतली. यावेळी तापकीर यांनी लिहलेल्या ‘अपरिचित दुर्गांची सफर’ या पुस्तकाचे प्रकाशन बलकवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे उपस्थित होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, ”गडकोट हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा कणा होता. भारतातील इतर किल्ले आणि महाराष्ट्रातील विशेषतः सहयाद्रीच्या किल्यांमध्ये फरक आहे. आपल्या किल्ल्यांचा इतिहास हा दैदिप्यामान आहे. इथे खूप मोठा संघर्ष झाला. स्वतंत्र्यापूर्वी इंग्रजांनी गडकोटाच्या वाटा सुरुंग लावून पाडल्या. दुर्गबंदी केली, कारण किल्ले हे स्वराज्याचे प्रेरणास्थान आहेत, हे त्याच्या लक्षात आले होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले. महाराष्ट्रात किल्ले, गडकोट, जलदुर्ग यांची संख्या खूप मोठी आहे. शेकडो किल्ले खाजगी किंवा वनखात्याकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. संरक्षण स्मारक नसल्याने तेथे काम करता येत नाही. अशा किल्ल्यांकडे जाऊन ते अभ्यासले जावेत.”
आजच्या तरुण पिढीला गटकोट किल्यांचे आकर्षण आहे. याबाबात ते जागृत झाले आहेत. तरुण आज गडकोट किल्ल्यावर जातात. त्यांचा अभ्यास करतात. ही परिस्थिती आशादायक आहे. तरुण लेखकांनी किल्ले आणि किल्ल्यांवरचे लेखन अधिकाधिक प्रमाणात करावे, अशी अपेक्षाही बलकवडे यांनी व्यक्त केली.
संतोष घुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक केले. विशाल सोनी यांनी प्रास्ताविक केले. मनोहर सोनावणे यांनी आभार मानले.