‘पीआयएलफ’मध्ये ‘विश्वकर्मा’कडून ६० पुस्तकांचे प्रकाशन
डॉ. मीरा बोरवणकर, डॉ. के. व्यंकटेशम, सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन; लेखकांशी संवादाची संधी
पुणे : विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रस्तुत व डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने २० ते २२ सप्टेंबर २०१९ या कालावधीत यशदा येथे होत असलेल्या सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे तब्बल ६० मराठी व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. तसेच ‘मराठी आज व उद्या’ या विषयावर चर्चासत्र, ख्यातनाम व नवोदित लेखकांशी वाचकांचा थेट संवाद होणार आहे, अशी माहिती विश्वकर्मा पब्लिकेशनच्या संचालिका तृप्ती अगरवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ख्यातनाम लेखक वीरेंदर कपूर, संपादक मनोहर सोनवणे, लेखक संदीप तापकीर आदी उपस्थित होते.
विशाल सोनी म्हणाले, “पुण्यासह राज्यात आणि देशात विश्वकर्मा पब्लिकेशन्स अनेक लेखकांना लिहिते करीत आहे. विदेशातील लेखकही आपली पुस्तके भारतात आणू इच्छित असून, त्यासाठी विश्वकर्माने पुढाकार घेतला आहे. मराठीच्या, साहित्याच्या भल्यासाठी जेजे करणे शक्य आहे, तेते करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यामुळेच आज आम्ही १८ राज्यांत, ५६ जिल्ह्यात २९१ पेक्षा अधिक पुस्तकालय, जवळपास १०० वितरक आणि २०-२५ पुस्तक प्रदर्शन अशा स्वरूपात काम करत आहोत. पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलच्या निमित्ताने ३० मराठी व ३० इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. त्यामध्ये माजी पोलीस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांच्या ‘इन्स्पेक्टर चौगुले, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या संकल्पनेतून साकारलेले पुणे पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेणारे ‘पोलीस फाईल्स’, पीएमपीएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे लिखित ‘आजचा दिवस माझा’, नरेंद्र गोईंदानी लिखित एकूण १२ पुस्तके, प्रतिभा रानडे लिखित ‘अमीर खुसरो’, संदीप तापकीर लिखित ‘अपरिचित दुर्गांची सफर’, वर्धमान जैन लिखित ‘मिठाचा गोडवा’ यासह ग्रुप कॅप्टन दीपक आपटे, वीरेंद्र कपूर, इस्कॉनमधील डॉ. केशवानंद दास यांच्या पुस्तकांचा यात समावेश आहे. विश्वकर्मा पब्लिकेशन्सने अनेक नवोदित लेखकांना लिहिण्याची संधी दिली आहे. देशभरातून हे युवा लेखक या महोत्सवात सहभागी होणार असून, वाचकांशी थेट संवाद करणार आहेत.”
“मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मराठी आज आणि उद्या’ या विषयावर विशेष चर्चासत्र ठेवण्यात आले असून, त्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व डॉ. लक्ष्मीकांत देशमुख आपले विचार मांडणार आहेत. डॉ. सदानंद बोरसे या दोघांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या किल्ल्यांच्या न सांगितलेल्या गोष्टी यावर संवाद करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्याकडून काय शिकावे, यावर शिवप्रसाद मंत्री चर्चा करणार आहेत. कादंबरीव्यतिरिक्तचे लेखन व कला याविषयी वीरेंद्र कपूर बोलणार आहेत. पुस्तक वाचन, लेखन यावर विशेष मार्गदर्शन सत्रे या महोत्सवात होतील. ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे विचार यावेळी ऐकायला मिळणार आहेत,” असेही विशाल सोनी यांनी नमूद केले.