पुणे : “त्यागभावनेतून केलेले कार्यच आपल्याला यशशिखरावर नेते. जीवनाचा खरा आनंद देत मानवी जीवन समृद्ध करते. त्याग, करुणा, मानवता भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. त्याच आधारावर आपली संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था जगभरात आदर्शवत आहे. या त्यागमूर्तींच्या कार्यातून प्रेरणा घेत आपल्यातील ‘माणूसपण’ जपायला हवे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.
‘सूर्यदत्ता’ संचालित बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यकर्त्या-उद्योजक प्रमिलाबाई व नौपतलालजी सांकला या दाम्पत्यास ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उद्योजक विजयकांत कोठारी यांना ‘समाजशिरोमणी’, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका यांना ‘समाजभूषण’, नीता घोडावत यांना ‘समाजरत्न’, तर भारती भंडारी यांना ‘मानवसेवा’ पुरस्कार हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
जैन, गुजराती, अगरवाल आणि माहेश्वरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आचार्य लोकेश मुनीजी, उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे सल्लागार सचिन इटकर, बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, “अनेक देशांत फिरलो. आपल्या सगळ्याना एकत्र बांधून ठेवणारी भारतीय संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था आदर्शवत असल्याचे आढळले. मात्र, भौतिक सुखांच्या मागे लागण्याचा नादात आपण आपली संस्कृती विसरत आहोत. अशावेळी या त्यागमूर्तींचा सन्मान होणे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. कठोर मेहनत, सचोटी, प्रामाणिकपणा आणि त्याग या गोष्टींचा अवलंब करीत या सगळ्यांनी आपले आयुष्य घडवले आहे. मातापित्यांच्या, वडीलधाऱ्यांच्या सन्मान करण्याची आपली परंपरा आहे.”
आचार्य लोकेश मुनी म्हणाले, “वडीलधाऱ्या, कर्तृत्ववान व्यक्तींचा झालेला हा सन्मान त्यांच्याप्रती कृतज्ञता आहे. कर्तव्य हाच धर्म मानून त्यांची आयुष्यभर सेवा केली आहे. निस्वार्थी भावनेने समाजासाठी, देशासाठी त्यांनी योगदान दिले. त्यांचा आदर्श घेत प्रत्येकाने आपल्या मनातील स्वार्थ काढून टाकला पाहिजे. त्यातून आपली आणि समाजाची प्रगती होत असते. या आदर्श व्यक्तिमत्वांकडून नव्या पिढीला संस्काराची शिदोरी देण्याची आवश्यकता आहे.”
विठ्ठलशेठ मणियार म्हणाले, ”नानापेठेच्या मातीतून पुढे आलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव होत आहे. त्याचा खूप आनंद आहे. कर्तबगार तसेच धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सन्मान करून तरुणांपुढे नवा आदर्श ठेवला जात आहे. माणसे कशी मोठी होतात, काय केल्याने मानसिक समाधान मिळते, हे या कार्यक्रमातून आजच्या पिढीला समजेल. शून्यातून यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तींकडून आपण शिकले पाहिजे. त्यातून आपले जीवन घडवले पाहिजे.”
प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे म्हणाले, “आपल्या आयुष्याची जडणघडण मातापित्यांचे संस्कार आणि गुरुची शिकवण यामुळे होते. जीवन जगण्याचा सन्मार्ग गुरु दाखवत असतो. गुरु-शिष्याचे नाते आपल्या भारतीय संस्कृतीत अजूनही अबाधित आहे. चांगले शिक्षण आत्मसात करीत उत्तम नागरिक आणि ‘माणूस’ बनण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे.”
रजा मुराद म्हणाले, ”मुलांना शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवणे हे पुण्याचे काम आहे. शिक्षणाबरोबरच जेष्ठांचा सन्मान करत नव्या पिढीसमोर आदर्श ठेवण्याचे कार्य सुषमा व संजय चोरडिया करीत आहेत. खूप मेहनत, काबाडकष्ट करून आई-वडील मुलांना शिक्षण आणि चांगले आयुष्य देण्यासाठी झटतात. त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा विसर पडता कामा नये. संपूर्ण जगात भारत एक असा देश आहे, जिथे जेष्ठांच्या पाया पडले जाते. ज्येष्ठांच्या आशीर्वादाची शक्ती मोठी असते.”
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ”आपल्या हृदयात प्रेम आणि करुणा हवी. आयुष्यात सतत प्रयत्नशील राहणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळेच आज ही सगळी मंडळी आपल्यासमोर आदर्श म्हणून सन्मानित होत आहेत. ज्यांच्याकडे दूरदृष्टी, संयम असतो, तोच ‘लीडर’ बनू शकतो. आजूबाजूला चांगले काम करणाऱ्या वक्तींकडून प्रेरणा घ्यायला हवी.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावेत, यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करत असते. अभ्यास, मेहनत, व्यायाम, आई-वडिलांचा, जेष्ठांचा सन्मान केला पाहिजे. माता-पिता व गुरूंचे स्मरण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यांचे संस्कार ही आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे.”
नौपतलाल सांकला म्हणाले, “बन्सीलाल हे माझे मित्र होते. त्यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार म्हणजे प्रेमाचे प्रतीक आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आम्ही सर्वानीच उद्योग सुरु केले. मात्र, कामातील प्रामाणिकता, सचोटी यामुळे यशस्वी होता आले. माझ्या या प्रवासात माझी धर्मपत्नी प्रमिलाबाईने मोलाची साथ दिली.”
प्रमिला सांकला म्हणाल्या, “आम्ही नेहमी गुरू आणि धर्माच्या संस्कारावर चालत आलो. यामुळेच सर्वांची प्रगती झाली. आमचे आई-वडील नेहमी गोरगरिबांची सेवा करायचे. त्यामुळे ते बाळकडू माझ्यामध्येही आले आणि तो वारसा पुढे आमच्या हातून सुरू आहे याचा आनंद वाटतो.”
विजयकांत कोठारी म्हणाले, “व्यवसाय करताना समाजातील प्रश्नांकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. आपल्यासोबत आपला समाजही पुढे येईल, याचा प्रयत्न प्रत्येकाने केला, तर देशाचेही विकास होतो. समाजाला बरोबर घेऊन जाणारी व्यक्ती अधिक जोमाने प्रगती करते. माझ्या हातून काही समाजकार्य घडले आणि त्याचा सन्मान झाला, याचा आनंद वाटतो.”
पृथ्वीराज धोका म्हणाले, “हा सन्मान आई-वडिलांच्या चरणी अर्पण करतो. अनेकांचे संसार उभारण्याचे काम करताना आनंद मिळतो. वाढते शहरीकरण, व्यग्र जीवनशैलीमुळे लग्न जुळवण्याचे काम अवघड होत चालले आहे. तरीही हे काम नेटाने करत असून, अनेक संस्था आणि लोक आपल्याशी जोडले जात आहेत, याचे समाधान आहे.”
नीता घोडावत म्हणाल्या, ”परिश्रमाला आत्मविश्वासाची साथ मिळाली, तर तुमच्या कामाला यश मिळते. समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. संजय घोडावत ग्रुपच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करत आहोत. समाज विकासासाठी तत्पर आहोत. पर्यावरण रक्षणासाठी देखील काम सुरू आहे.”
भारती भंडारी म्हणाल्या, “भौतिक सुखांच्या मागे धावण्याच्या नादात आपण आपल्यातील माणूसपण विसरता कामा नये. मानवसेवेतून मिळणारा आनंद विलक्षण असतो. पती विजय भंडारी यांच्या साथीने मला विविध व्यक्ती, संस्थांबरोबर हे मानवसेवेचे काम करता आले, ही आनंदाची बाब आहे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी प्रास्ताविक व पुरस्काराच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.