अमोल झिरमिले म्हणाले, “अन्न-वस्त्र-निवारा यासह आज वीजही आपल्या आयुष्यातील महत्वाची गरज बनली आहे. तिच्या पूर्ततेसाठी आपण निसर्गाला हानी पोहोचवत आहोत. इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी त्याची टंचाई येत्या काळात भासणार आहे. म्हणून वेळीच गरज ओळखून निसर्गात उपलब्ध ऊर्जेचा वापर आपण करून घ्यायला हवा. तंत्रज्ञानामुळे या नैसर्गिक संसाधनांचे ऊर्जेत रूपांतर करणे अधिक सुलभ झाले आहे. पवनचक्की, सौरपॅनेल याचा वापर आगामी काळात व्हावा.”
अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर काळाची गरज
अमोल झिरमिले यांचे मत; विज्ञान परिषद, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सतर्फे व्याख्यान
पुणे : “पेट्रोल, गॅस, कोळसा अशा इंधनस्रोताचा ऱ्हास थांबवून निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या पवन, जल आणि सौर ऊर्जेसारख्या नैसर्गिक स्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात इंधन टंचाई भासणार आहे. त्यामुळे या नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा वापर करण्याबाबत जागृती होणे आवश्यक असून, सरकारकडून त्यासाठी प्रोत्साहन म्हणून अनुदान योजना आणल्या जात आहेत,” असे मत अमोल झिरमिले यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या वतीने ‘अपारंपरिक ऊर्जास्रोत : सत्य आणि मिथक’ या विषयावर झिरमिले यांचे व्याख्यान झाले. जंगली महाराज रस्त्यावरील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे प्रा. राजेंद्र सराफ, विज्ञान परिषदेचे संजय मालती कमलाकर, संतोष गोंधळेकर यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. राजेंद्र सराफ म्हणाले, “प्रत्येक नागरिकांनी सौरऊर्जेचा वापर करावा. विद्यापीठ, कॉलेज यांनी त्या भागात नैसर्गिक पवनचक्कीसाठी माहिती संकलन करून ठेवावे. जेणेकरून भविष्यात प्रकल्प राबवता येईल. वाऱ्याचा वेग जिथे कमी आहे, त्या ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करून त्यातून ऊष्णता निर्माण करून पवन ऊर्जा निर्माण करता येईल.”