शेतकऱ्यांनी ‘जीएम’ऐवजी पारंपरिक वाण वापरावीत
डॉ. सुहास कोल्हेकर यांचे मत; विज्ञान परिषदेतर्फे ‘जीएम पिके आणि सुरक्षित अन्न’वर व्याख्यान
पुणे : ”पीक चांगले येण्यासाठी वापरले जाणारे जनुकीय परावर्तीत किंवा जीएम वाणामुळे हवा, पाणी, जमिन तसेच पर्यावरणावर परिणाम होतो. भारतासह विविध देशामध्ये जीएम पिकांवर बंदी आणली आहे. या पिकांसोबत आरोग्यासाठी घातक अशी रासायनिक तणनाशकेही वापरली जातात. ती आरोग्यासाठी घातक आहेत. शेतकऱ्यांनी जीएम पिकांऐवजी पारंपरिक वाण, सेंद्रिय व नैसर्गिक शेती करण्यास प्राधान्य द्यावे. ग्राहकांचा सुरक्षित व पौष्टिक अन्न मिळवण्याचा हक्क जपला जावा,” असे मत सूक्ष्मजीव विज्ञान संशोधिका डॉ. सुहास कोल्हेकर यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने ‘जीएम पिके आणि सुरक्षित अन्न’ या विषयावर डॉ. सुहास कोल्हेकर यांचे नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात व्याख्यान झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., कार्यकारणी सदस्य ऍड. अंजली देसाई यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुहास कोल्हेकर म्हणाल्या, ”जीएमची पिके, बीटी वाण आरोग्याला, पर्यावरणाला घातक आहेत. भारतात बीटी कापसाशिवाय इतर कुठल्याही पिकांची लागवड करण्यास बंदी असताना नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा हक्क हवा, अशी मागणी काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करत आहेत. अवैध मार्गाने अशी बियाणे अथवा रोपे शेतकऱ्यापर्यंत पोहचवून त्यांची फसवणूक होता कामा नये. तसेच ग्राहकांनाही विषमुक्त अन्न मिळायला हवे. जागरूक नागरिकांनी एकत्रित पयत्न करून हे थांबवावे. पारंपरिक वाण आणि सेंद्रिय नैसर्गिक शेती यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांचे स्वास्थ्य चांगले राहील.”
जीएमसोबत राऊंडअप या तणनाशकाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे हवा, पाणी प्रदूषित होते. जमिनीतील जिवाणू नष्ट होतात. म्हणून तणनाशक वापरण्यावर बंदी आणण्यासाठी कायदेशीर कारवाईचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विनय र. र म्हणाले, ”शेतात फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या दुष्परिणामांची माहिती घ्यायला हवी. आपल्याकडील जमीन आणि पर्यावरण पारंपरिक बियाण्यांना अनुकूल आहे. मात्र, अशा प्रदूषित बियाण्यांमुळे पैसा, जमीन आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पारंपरिक बियाणे वापरण्यासाठी जागृती केली पाहिजे. ऍड. अंजली देसाई यांनी प्रस्तावना केली.