डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, “प्रत्येकाची ‘समाजसेवेची’ व्याख्या भिन्न असू शकते. प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे. एमआयटीच्या स्थापनेपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम सुरु आहे. लातूरमधील किल्लारीचा किंवा गुजरातेतील भुजचा भूकंप असो किंवा उत्तराखंडचा महाप्रलय असो अशा अनेक आपत्तीमध्ये एमआयटीने सहभाग घेत पीडितांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावना रुजावी, या उद्देशाने अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे आयोजिले जातात.” शिल्पा तांबे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश कुलकर्णी यांनी आभार मानले.
समाजसेवा दुर्बलांचे आयुष्य ‘आनंदमय’ करणारी असावी- डॉ. प्रकाश आमटे
पुणे : “सामाजिक काम करण्यासाठी एखादा प्रेरणास्रोत असावा लागतो. समाजातील दुर्बल घटकांच्या, दिव्यांगांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचे काम करणे म्हणजे समाजसेवा आहे. प्रत्येकाने आपल्याला जमेल तसे काम करावे. मात्र, ते काम करताना आपण ज्यांच्यासाठी काम करतो आहोत, त्यांच्या जगण्यात सकारात्मक बदल होतोय, यावर भर दिला पाहिजे. आपली समाजसेवा इतरांचे जीवन आनंदमय करणारी असावी,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ गव्हर्नमेंट यांच्यातर्फे ‘समाजसेवा म्हणजे नक्की काय रे भाऊ?’ अर्थात ‘रिडिफायनिंग सोशल वर्क’ या विशेष चर्चासत्रात डॉ. आमटे बोलत होते. कोथरूड येथील एमआयटी कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद सभागृहात यावेळी डॉ. मंदाताई आमटे, हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, एचआयव्ही एड्स पीडितांसाठी आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या बालकांच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या श्रीगौरी सावंत, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, लोकबिरादरी मित्र मंडळाचे शिल्पा तांबे आदी उपस्थित होते. योगेश कुलकर्णी आणि विदुला लोम यांनी आमटे दाम्पत्यांशी संवाद साधला.
डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, “समाजातील गरजा आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. एका तरी माणसाला मदत करुन त्यात मिळणारा आनंद आपण अनुभवला पाहिजे. बाबा आमटे आणि ताईनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारले. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत आम्ही आदिवासी भागात वैद्यकीय आणि शैक्षणिक काम उभारले. आदिवासी समाज पापभिरू, निष्पाप आणि विचारांनी समृद्ध आहेत. एकमेकांना मदत करण्याची त्यांची संस्कृती आहे. फक्त आपण शिकलेले लोक त्यांना मागास म्हणतो. गेल्या काही काळात या समाजातील अनेक तरुण शिकले आहेत. पण त्यांनी समाजाशी नाळ जोडलेली असून, त्यांचे काम सुरु आहे. आज आमची चौथी पिढी यामध्ये निरपेक्ष भावनेने काम करीत आहे. निरपेक्ष भावनेने केलेले काम आपल्याला समाजात प्रतिष्ठा देते.”
डॉ. मंदाताई आमटे म्हणाल्या, “आमच्या मुलांना आणि नातवाना या अदिवासी मुलांसोबतच शिक्षण देतोय. संस्था आमची असली तरी आम्ही शिक्षकांना कोणतेच निर्बंध लादले नाहीत.
लग्न झाल्यानंतर जेव्हा मी आनंदवनात गेले, तेव्हा उपचारासाठी लोक येत नव्हते. त्यांना बाबा-बुवा, अंधश्रद्धा यावर जास्त विश्वास होता. त्यामुळे नैराश्य आले होते. हळूहळू आदिवासींना त्याचे महत्व समजू लागले आणि हेमलकसामध्ये काम उभे राहिले. प्रकाश आणि माझा प्रेमविवाह असल्यामुळे माझ्यासाठी तेच प्रेरणास्थान आहेत. सामाजिक कार्यात एकदा झोकून दिल्यानंतर इच्छाशक्तीने काम करत गेले पाहिजे. आदिवासींना शिकलेल्या माणसांविषयी भीती होती. पण त्यांच्याशी मिसळून काम केल्याने आज एक कुटुंब झाले आहे. आजच्या तरुणांना सामाजिक काम करावे वाटते, ही सकारात्मक गोष्ट आहे.”
आपल्यातले ‘माणूसपण’ जिवंत ठेवा : श्रीगौरी सावंत
तृतीपंथीयांना कायद्याने माणूस म्हणून स्वीकारले आहे. परंतु समाजाकडून अजूनही म्हणावी तशी वागणूक दिली जात नाही. तुमच्याप्रमाणेच आम्हालाही आईवडिलांनी जन्म दिला आहे. निसर्गाने आमच्यातील लैंगिकता निश्चित केली आहे. त्यामुळे आमच्याकडे तिरक्या नजरेने पाहण्याऐवजी आपल्यातील माणूसपण जिवंत ठेवून आम्हाला मुक्तपणे जगू द्यावे. आज शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी आम्ही करतोय. त्यासाठी ‘आजीचं घर’ आहे. येणाऱ्या पिढीला शरीर विक्रयाचे काम करायला लागू नये, तसेच वयोवृद्ध तृतीयपंथीयांसाठी आम्ही काम करत आहोत. आम्हाला शिक्षणाबरोबर नोकरीही हवी आहे. रस्त्यावर तृतीयपंथीय दिसले तर त्यांना चांगली वागणूक द्या आणि आपल्या हास्यामुळे इतरांचे आयुष्य सुखी होईल, यासाठी प्रयत्न करा.