पुणे : “स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे योगदान मोठे आहे. पुण्यातून अनेक क्रांतिकारक घडले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकरांचा इतिहास नव्या पिढीला सांगितला पाहिजे. त्यासाठी क्रांतिकारकांचे योगदान पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करायला हवे,” असे प्रतिपादन लखनौ विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख प्रा. प्रवीणकुमार श्रीवास्तव यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (मुंबई) आणि एच. व्ही. देसाई महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने थोर क्रांतीलेखक आणि क्रांतीकारकांचे चरित्रकार वि. श्री. जोशी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त एच. व्ही. देसाई महाविद्यालयात आयोजिलेल्या व्याख्यानात ‘अंदमानातील क्रांतिकारकांचे जीवन’ या विषयवार श्रीवास्तव बोलत होते. यावेळी वि. श्री. जोशी यांचे चिरंजीव चंद्रशेखर जोशी, एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश पठाडे, उपप्राचार्य डॉ. गणेश राऊत, सावरकर स्मारकाच्या मंजिरी मराठे, नितीन शास्त्री, डॉ. गीतांजली घाटे, सुधाकर पाटील उपस्थित होते.
प्रवीणकुमार श्रीवास्तव म्हणाले, “पुण्यात क्रांतिकारकांवर कार्यक्रम आयोजिले जातात, हे इतिहासाच्या पुर्नजीवनासाठी उपयुक्त आहे. उत्तरप्रदेशमध्ये असे कार्यक्रम कमी होतात. स्वातंत्र्यासाठी झालेल्या आंदोलनांचा समावेश पाठ्यपुस्तकात व्हायला हवा. मीही अनेक क्रांतिकारकांच्या मुलाखती टेप रेकॉर्डवर घेतलेल्या आहेत. जवळपास पन्नास तासांचे रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे. बाहेर देशात व्याख्यानादरम्यान उल्लेख केल्यानंतर तेथील सरकारने ते डिजिटल स्वरूपात मांडण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, आपल्याकडील राज्यकर्त्यांना त्याचे महत्व अजूनही समजले नाही. इतिहासकारांना दुय्यम समजने योग्य नाही. सरकारने योग्य तो विचार करून क्रांतिकारकांच्या इतिहास संवर्धनासाठी तरतूद करावी.”
अरविंद गोखले म्हणाले, “अनेक क्रांतिकारकांनी विविध वेशभूषा करून इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले होते. या सगळ्या चळवळीमध्ये अनेक क्रांतिकारकांना तुरुंगात जावे लागले आणि त्यांना चळवळीत सहभागी असलेल्यांची नाव सांगण्यासाठी प्रचंड छळवणूक केली गेली, परंतु एकाही क्रांतिकारकांनी दुसऱ्या क्रांतिकारकांची नावे सांगितली नाहीत, यावरून त्यांची देशावरील प्रेमाची आणि एकनिष्टपणाची जाणीव होते. लोकमान्य टिळक आणि चाफेकर बंधू यांचे स्वतंत्र्यातील योगदानही फार मोठे आहे, त्यामुळे यांचे योगदान आपल्याला विसरून चालणार नाही. टिळक अजुन काही दिवस आपल्यात राहिले असते, तर आजचे चित्र काही वेगळेच पाहायला मिळाले असते.”
मंजिरी मराठे म्हणाल्या, “क्रांतीकारकांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक करत आहे. स्मारकाच्या वतीने मोडी लिपीचे वर्ग, धनुर्विद्या, व्यायाम शाळा हे उपक्रम राबविले जातात. तसेच सावरकरांचे कार्य ‘हे मृत्युंजय’ या नाट्यातून विद्यार्थ्यांसाठी सादर केले जात आहे. आतापर्यंत पन्नास हजार विद्यार्थ्यांपर्यंत या नाट्यातून सावरकरांचे कार्य पोहचले आहे. वि. श्री. जोशी यांचे सर्व साहित्य स्मारकाकडे त्यांच्या वारसदारांनी सुपूर्त केले आहे. त्याचेही संग्रह, संवर्धन आणि प्रसार करण्याचे काम आम्ही करत आहोत.”
गिरीश पठाडे म्हणाले, “क्रांतीकारकांचे चरित्र लिहणे कष्टाचे आणि धैर्याचे काम आहे. जोशी यांनी अत्यंत अचूकपणे ही चरित्र साहित्य रूपात मांडले आहेत. कित्येक क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, याची जाणीव प्रत्येकांने ठेवली पाहिजे.” डॉ. गणेश राऊत म्हणाले, “क्रांतीकारकांचे खरे चरित्रकार वि श्री जोशी होते, जोशी यांनी अनेक क्रांतीकारकांचे जीवनावर प्रकाश टाकत बऱ्याच गोष्टींची उकल केली आणि आपल्या चरित्र ग्रंथातून सर्वांसाठी ती खुले केले. जोशींचे साहित्य पुढील कित्येक पिढ्याना प्रेरणादायी ठरणार आहे.”
सूत्रसंचलन डॉ. नीता बोकील यांनी केले. आभार प्रतीक घोलप यांनी मानले.