पुणे : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविण्याच्या, तसेच जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेच्या निर्णयाचे स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (A) पेढे वाटून करण्यात आले. केंद्र सरकारने उचलेले हे धाडसी पाऊल असून, यामुळे काश्मिरी जनता खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाच्या अखत्यारीत येईल आणि तेथील जनतेचा विकास होईल, असा आशावाद व्यक्त करीत रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे प्रदेशअध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष ऍड. अयुब शेख, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे आदी उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. जम्मू-काश्मीर, लडाख यांना वेगळे करून तेथील नागरिकांना स्वायत्तता देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक असून, तो यापुढेही भारताचा भाग राहणार आहे, हे दाखवून देणारा हा निर्णय आहे. आता तेथे उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, कंपन्या आणि पायाभूत सुविधा उभ्या राहतील. पुणे शहराच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना धन्यवाद देतो.”
बाळासाहेब जानराव म्हणाले, “या निर्णयामुळे जम्मू काश्मीरच्या लोकांना न्याय मिळेल. इतर राज्यातील लोकांप्रमाणे त्यांनाही उद्योग, व्यवसायाच्या संधी समान प्रमाणात मिळतील. त्यांचा विकास होईल. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचे अभिनंदन करतो.” ऍड. अयुब शेख म्हणाले, “या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करतो. या धाडसी निर्णयामुळे जम्मू-काश्मीर, लडाखचा विकास होईल. तेथील तरुणांना रोजगार मिळतील. नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या संकल्पाला सत्यात आणले आहे.”