पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या १०-१२ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरले असून, त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी नद्यांना पूर आला असून, पाणी नागरी वस्त्या, झोपडपट्यांमध्ये शिरले आहे. परिणामी हजारो नागरिकांचे अतोनात हाल होत असून, अनेकजण अंगावरच्या कपड्यांनिशी विस्थापित झाले आहे. या पूरग्रस्तांना प्रशासनाने तातडीची मदत करावी, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) वतीने देण्यात आले.
निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी हे निवेदन स्वीकारत तातडीने आदेश देऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे प्रदेशअध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष ऍड. अयुब शेख, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे आदी उपस्थित होते.
मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली असून, सरकारी शाळा, धार्मिक स्थळे, समाज मंदिरे अशा ठिकाणी आश्रय घेतला आहे. शहरातील येरवडा, शांतीनगर, आदर्शनगर, इंदिरानगर, बोपोडी, औंध, कामगार पुतळा, पाटील इस्टेस्ट, म्हात्रे पूल, सिंहगड रास्ता, एरंडवणा, ताडीवाला रस्ता यासह नदी काठाच्या अनेक भागातील घरांमध्ये पाणी घुसले आहे. जवळपास ४-५ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत. प्रशासनाने अद्यापही म्हणावी तशी दखल घेतली नसून, आपद्ग्रस्त नागरिकांना मदत मिळालेली नाही. प्रशासनाने त्वरित पाहणी करून आपद्ग्रस्तांना नागरी सुविधा व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, तसेच ५० हजार ते एक लाखापर्यंत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.