साताऱ्यातील ‘रयत’मध्ये सहावे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन
रयत शिक्षण संस्थेस क्रांतीदूत, तर डॉ. भाऊसाहेब कराळे यांना ‘आदर्श रयतसेवक’ पुरस्कार
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा यांच्या वतीने सहावे विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (दि. ९ ऑगस्ट) रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. संमेलनात दिला जाणारा ‘कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतीदूत पुरस्कार’ रयत शिक्षण संस्थेला, तर ‘कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श रयतसेवक पुरस्कार’ डॉ. भाऊसाहेब कराळे यांना ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत ऍड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
संमेलनात शुक्रवारी सकाळी ९ वाजता बंधुता साहित्य प्रबोधनयात्रा काढण्यात येणार असून, त्यामध्ये महाविद्यालयातील ५०० सावित्रीच्या लेकींचा सहभाग असेल. १० वाजता संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. कवी शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधनयात्री कविसंमेलन होईल. त्यामध्ये मधुश्री ओव्हाळ (पुणे), संतोष मोहोळकर (नांदेड), विजय जाधव (ठाणे), डॉ. भीम गायकवाड (पुणे) आणि संगीता झिंजुर्के (बीड) हे निमंत्रित कवी सहभागी होतील. यावेळी दादासाहेब खांदवे (सोलापूर), माधव गव्हाणे (परभणी), प्रा. धर्मवीर पाटील (इस्लामपूर) यांना ‘प्रबोधनयात्री पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येईल. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची प्रकट मुलाखत होईल. परिसरातील विद्यार्थी आणि शिक्षकांना या संमेलनामध्ये विशेषत्वाने सहभागी होता येईल. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रवींद्र पाटील, प्रा. प्रशांत रोकडे आणि महेंद्र भारती यांनी पुढाकार घेतला आहे, असे बंधुता परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी सांगितले.