पुणे महापालिकेच्या वतीने महातेकर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ प्रदान
पुणे : “अविनाश महातेकर हे अतिशय प्रांजळ, प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. विचारांशी एकनिष्ठ राहत आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिलेले आहे. समाजाचा सर्वांगीण विकास हे बाबासाहेबांचे सूत्र आणि माणसाला जोडणारे बुद्धांचे तत्त्वज्ञान जगणाऱ्या महातेकरांनी आंबेडकरी चळवळीच्या कार्यात यापुढेही कायम सक्रिय राहावे व समाजाच्या विकासात योगदान द्यावे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
पुणे महापालिकेच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत व संपादक आणि राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले ,रिपब्लिक पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक कांबळे, अल्पसंख्याक आघाडीचे आयुब शेख, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, फरझाना शेख, सोनाली लांडगे, नगरसेवक राजेश येनपुरे, प्रा. विलास आढाव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “लोकमान्य टिळक यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात, तर डॉ. आंबेडकर यांनी रचनेत मोठे योगदान दिले. पुण्यात होणारा सन्मान मोठा असतो. येथे सर्व जातीधर्माचे लोक एकत्रितपणे नांदतात, ही आनंदाची बाब आहे. नरेंद्र मोदी हे संविधानाला प्रमाण मानून काम करीत आहेत. संविधानामुळेच एक चहा विकणारा माणूस पंतप्रधान झाला, याचा त्यांना अभिमान आहे. त्यामुळे संविधान बदलणार, अशा वावड्या आहेत. निळा झेंडा घेऊन मी संविधानाच्या रक्षणासाठी दिल्लीत आहेत. मोदी हटावसाठी एकत्र आलेलेच बाजूला हटले. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या पाठीशी उभा राहतो, त्याची सत्ता येते, हे आपण समजून घ्यावे. एकही खासदार नसताना मंत्रीपद मिळाले, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. परंतु, पण आमची ताकद आहे आम्ही ज्यांना पाठिंबा ते निवडून येतात. कारण आमची पुण्यासह इतर अनेक शहरांत ताकद आहे. मला अनेकजण कुत्रा, मांजर, गल्लीबोळातील कार्यकर्ता म्हणून हिणवत असतात. मात्र, त्याकडे लक्ष न देता मी दिल्लीत चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो.”
अविनाश महातेकर म्हणाले, “ज्या शहरात घडलो, त्या शहराच्या वतीने झालेल्या या सन्मानाने मोठा आनंद झाला आहे. आंबेडकरी चळवळीच्या निमित्ताने अनेक लोकांच्या संगतीने जीवन समृद्ध होत गेले. विचारांशी प्रामाणिक राहत योग्य वेळी सन्मान मिळेल ,याची खात्री होती. त्यामुळे मागून काही घ्यायचे नाही आणि सन्मानाने मिळाल्याशिवाय स्वीकारायचे नाही हा संस्कार माझ्यावर झाला. आजही हा संस्कार जगतो आहे. संविधान कोणीही बदलू शकत नाही. काहीजण विनाकारण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे चुकीचे आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार आंबेडकरी चळवळीचा गाभा आहे.”
गिरीश बापट म्हणाले, “महातेकर दलित चळवळीतील धडाडीचे अभ्यासू नेते आहेत. मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांना मंत्रिपद मिळाले आहे. पुढेही ते कायम राहील. पीडित लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. तसेच समाजकल्याण खात्याला आलेली मरगळ झटकण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.”
प्रास्ताविक मुक्ता टिळक यांनी केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.