दानशूर माहेश्वरी समाजाने राष्ट्रविकासात योगदान द्यावे -रामेश्वरलाल काबरा
पुणे : “समाजात दोनच जाती असल्या पाहिजेत. एक गरीब आणि दुसरी गरिबाला मदत करणारी. माहेश्वरी समाज दानशूर आहे. समाजातील गरजू, गरीब व होतकरूना सर्व प्रकारची मदत करण्यात माहेश्वरी समाजातील अनेकजण कायम पुढे येतात. मुकुंददास लोहिया यांच्यासारखे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. माहेश्वरी समाज दानशूर असून, समाजाने राष्ट्राच्या विकासातही मोठा वाटा द्यायला हवा,” असे प्रतिपादन उद्योगपती आणि समाजसेवक पद्मश्री रामेश्वरलाल काबरा यांनी केले.
माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशन व महेश सांस्कृतिक भवन संचालित उभारण्यात येत असलेल्या मुकुंददासजी लोहिया सॅनिटोरियम व अतिथी भवनाचे भूमिपूजन व शिलान्यास समारंभावेळी रामेश्वरलाल काबरा बोलत होते. अप्पर इंदिरानगर येथील महेश सांस्कृतिक भवनात झालेल्या या समारंभावेळी अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे सभापती शामसुंदर सोनी, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी, माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज राठी, सचिव संजय चांडक, कोषाध्यक्ष श्रीप्रकाश बागडी, सल्लागार हिरालाल मालू, संजय बिहानी, राजेंद्र भट्टड, हरीभाऊ भुतडा, शामसुंदर कलंत्री, मदनलाल भुतडा, संतोष लड्डा, अशोक राठी, दिलीप धूत, विजयराज मुंदडा, भंवरलाल पुंगलिया, रामविलास तापडिया आदी उपस्थित होते.
यावेळी अतिथी भवनाच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या पुरुषोत्तम लोहिया, पुष्पलता झंवर, धनराज राठी यांच्यासह इतर देणगीरांचा सत्कार करण्यात आला. मुकुंदनगर येथील टिमवि कॉलनीमध्ये सॅनिटोरियम व अतिथीभवन आणि बहुद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी, व्यक्तिगत कामांसाठी येणाऱ्या समाजबांधवांना राहण्याची सोय व्हावी, याची उभारणी करण्यात येत आहे. यामध्ये २१ सॅनिटोरियम, २१ अतिथी कक्ष, अल्प दारात भोजनव्यवस्था, वातानुकूलित हॉल, प्रशस्त पार्किंग अशी नऊ मजली इमारत उभारण्यात येत आहे.
रामेश्वरलाल काबरा म्हणाले, “समाजाने केवळ आपल्यापुरते मर्यादित राहू नये. देशातील इतर समाजातील अनेक लोकांना मदतीची गरज आहे. समाजातील एकही मुलगा-मुलगी पदव्यूत्तर पेक्षा कमी शिकणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. नव्या पिढीमध्ये दातृत्वाचे संस्कार देणे महत्वाचे आहे. आपला माहेश्वरी समाज संस्कार, अर्थार्जन, संघटन, शिक्षण या सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ आहे. त्यामुळे समाजासाठी योगदान देताना आपण आपल्या स्वतःसाठी काम करत आहोत, ही भावना ठेवली पाहिजे. चांगल्या कामांसाठी पैसे कधीही कमी पडत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे भवन वेगवेगळ्या भागात व्हावीत.”
शामसुंदर सोनी म्हणाले, “पुण्यात शिक्षण, आरोग्य व उद्योग यांसारख्या कामांसाठी अनेक समाजबांधव येत असतात. त्यांच्या सोयीसाठी हे अतिथीभवन उपयुक्त ठरेल. दानशूरांच्या देणगीतून उभ्या राहिलेल्या वास्तू ऐतिहासिक ठरतात. त्यामुळे पुण्याच्या चारही बाजूने अशी अतिथीभवन व्हावीत. माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनने समाजाच्या कार्याला दिशा देण्याचे काम केले आहे.”
मधुसूदन गांधी म्हणाले, “पुणे शहर हे दूरदृष्टी असलेल्या लोकांचे आहे. पुण्यातून अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक कामांचा शुभारंभ होतो आणि त्याची देशभर दखल घेऊन इतर ठिकाणी तशी कामे होतात. समाजातील अनेक दानशूर लोक पुढे आले, तर अशा प्रकारची सामाजिक भवने इतर ठिकाणीही उभारता येतील. पुण्यातील समाजाने यासाठी पुढाकार घेतला आहे.”
पुरुषोत्तम लोहिया यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या अतिथी भवनाच्या उभारणीत योगदान दिले असून, त्याचे समाधान शब्दांपलीकडील आहे, अशी भावना व्यक्त केली. अशोक राठी यांनी प्रास्ताविक करत फाउंडेशनच्या कामाचा आढावा घेतला. अभय जाजू यांनी सूत्रसंचालन केले. संजय चांडक यांनी आभार मानले.