पुणे : “भारतातील उद्योजकांनी आपल्या नफ्यातील काही भाग समाजाच्या हितासाठी वापरावा, याकरीता महात्मा गांधी यांनी पुढाकार घेतला. गांधी हे भारतातील ‘सीएसआर’चे प्रणेते आहेत. ‘सीएसआर’च्या माध्यमातून होत असलेल्या समाजपयोगी उपक्रमात टाटा उद्योग समूहाचे मोठे योगदान आहे. आज देशातील अनेक कंपन्या ‘सीएसआर’ निधीच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी पुढे येत आहेत. आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अशा विविध प्रकारच्या उपक्रमात भारतात ‘सीएसआर’ मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहे, ही देशाच्या विकासासाठी महत्वाची बाब आहे,” असे मत आंतरराष्ट्रीय रिटेल मार्केटमधील रिटेल ऑपरेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सावरकर यांनी व्यक्त केले.
तर ‘सीएसआर’च्या निधीचा विनियोग हा समाजातील गरजू आणि पात्र लोकांसाठीच व्हायला हवा. तसेच उद्योगांकडून दिल्या जाणाऱ्या ‘सीएसआर’ निधीचे मूल्यांकनही व्हायला हवे, असे मत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये (एसआयबीएमटी) आयोजित ‘सीएसआर : भारतातील सद्यस्थिती’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत अभिजित सावरकर बोलत होते. प्रसंगी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, राउंड ग्लास ऑर्गनायझेशनचे प्रमुख धवल मोदी, डॉ. संजय चोरडिया, कावेरी महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. श्वेता बापट, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड मास कम्युनिकेशन्स रिसर्च हेड डॉ. धनंजय अवसरीकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या परिषदेला प्राध्यापक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
अभिजित सावरकर म्हणाले, “उद्योगातील नफा आणि त्याचा समाजासाठी विनियोग याचा ताळमेळ घालता आला पाहिजे. ‘सीएसआर’साठी अनेक देश पुढाकार घेत आहेत. भारतातही अनेक उद्योग ‘सीएसआर’च्या माध्यमातून भरीव काम करीत आहेत. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासह सामाजिक उपक्रमात ‘सीएसआर’ मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. ‘सीएसआर’सह पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ आपण समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाने देशाच्या विकासात आपले योगदान दिले पाहिजे.”
रवींद्र धारिया म्हणाले, “वनराईमार्फत ‘सीएसआर’ निधीतून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. जलसंधारण, पर्यावरणाचा ऱ्हास, विजेची टंचाई आणि कचरा व्यवस्थापन यामध्ये मोठे काम व्हायला हवे. हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा, झव्हेरी ऍग्रो यासह इतर अनेक बड्या कंपन्या वनराईशी ‘सीएसआर’मुळे जोडल्या आहेत. वनराईमध्ये वेळ, विश्वास, ठेवी, पारदर्शकता, कार्य, चिकाटी, कौशल्य, तत्रंज्ञान, आणि कृतज्ञता या गोष्टींना आम्ही प्राधान्य देतो.”
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांतील उद्यमशीलतेला वाव देण्यासह त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य सूर्यदत्ता करत आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच त्यांच्यात संवेदनशीलताही तेवत ठेवणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने उच्च दर्जाचे संशोधनपर शिक्षण, तज्ञ मार्गदर्शन विद्यार्थ्यांना पुरवले जाते. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट देखील अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना ‘सीएसआर’चे महत्व पटवून देते.”
डॉ. धवल मोदी यांनी ‘सीएसआर’ संदर्भातील संरक्षण, नवकल्पना आणि विस्तार याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना स्वयंसेवी संस्था किंवा विविध कंपन्यांमध्ये ‘सीएसआर’ प्रकल्प घेण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. श्वेता बापट यांनी शाश्वत विकासातील ‘सीएसआर’चे महत्व स्पष्ट केले. डॉ. धनंजय अवसरीकर यांनी ‘सीएसआर’च्या कायदेशीर बाबींविषयी माहिती दिली. डॉ. श्रीप्रकाश सोनी यांनी आभार मानले.