पुणे: दम्यासंबंधित गैरसमज दूर करुन लोकांच्या मनातील भीती कमी करण्याच्या, तसेच दमाग्रस्तांना बंधमुक्त आयुष्य जगता येण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. जागतिक दमा दिनाच्या निमित्ताने दमाच्या यशस्वी नियोजनासाठी ‘बेरोकजिंदगी’ उपक्रमातून इन्हेलेशन थेरपीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इन्हेलेशन थेरपी आणि दम्याच्या रुग्णांना समाजात अधिक स्वीकारार्ह बनवण्याचे ध्येय हाती घेण्यात आले आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या फिजिशयन्समध्ये चांगला संवाद निर्माण होऊ शकेल. आजवर ‘बेरोकजिंदगी’ उपक्रमांतून अनेकांनी दम्यावर विजय मिळवला आहे. दम्याच्या यशस्वी नियोजनासाठी मार्गदर्शक असलेल्या ’बेरोकजिंदगी’ जनजागृती अभियानाला सर्व रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पुण्यामधील चेस्ट फिजिशियन डॉ. हिमांशू पोफळे आणि पेडियाट्रिशियन, चेस्ट फिजिशियन डॉ. शशांक कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. हिमांशू पोफळे म्हणाले, ”दमा आणि इन्हेलेशन थेरपीविषयीचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. दम्याचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम व त्याचे गांभीर्य कमी करण्यात इन्हेलेशन उपचारपद्धती मोठी भूमिका बजावते. इन्हेलेशनच्या माध्यमातून घेतल्यामुळे औषधे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. रुग्णांना उपचारांचा संपूर्ण फायदा मिळावा यासाठी सांगण्यात आलेल्या उपचारांचा त्यांनी पूर्णपणे स्वीकार करणे गरजेचे आहे. दमा रोखण्यासाठी आणि त्याच्या लक्षणांपासून सुटका करण्यासाठी तसेच दम्याचा त्रास कमी करून दम्याच्या विकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्हेलेशन उपचार केले जातात, पण जेव्हा रुग्ण जनरल प्रॅक्टिशनरला सहाय्य करून त्याने सांगितलेल्या पद्धतीने औषधे घेतो, तेव्हाच त्या उपचारांचा परिणाम दिसतो. इन्हेलर्स, स्पेसर्स, रोटाहेलर्स आणि नेब्युलायझर्स या साधनांच्या माध्यमातून औषधे इन्हेल करण्याची अद्ययावत सुविधा निर्माण झाल्यामुळे दम्याचे नियोजन सोपे झाले आहे. औषधे थेट आवश्यक अवयवापर्यंत म्हणजेच फुफ्फुसांत पोहोचतात. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम न होता कमी किंमतींमध्ये औषधांचे सर्वाधिक फायदे मिळतात. लक्षणे नाहीत म्हणजे दमा नाही, हा समज चुकीचा आहे. जरासे बरे वाटू लागले की औषधे थांबवणे योग्य नाही. त्यामुळे आजार पुन्हा बळावतो आणि त्याचा दुहेरी दुष्परिणाम होतो. औषधोपचार थांबवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. दम्याला दीर्घकालीन उपचारांची गरज असते.”
डॉ. शशांक कदम म्हणाले, ”दीर्घकालीन दम्यासारख्या आजाराबाबत जागृती निर्माण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘बेरोकजिंदगी’मुळे दम्यावर विजय मिळवता येणार आहे. रुग्णांना त्यांच्याच आजारावर अधिक योग्य पद्धतीने उपचार घेण्यामध्ये स्वत:ला सहभागी करुन घेता येणार आहे. डॉक्टरांच्या सहाय्याने दम्यावर नियंत्रण मिळवून इन्हेलरचा कमीत-कमी वापर करण्याचे ध्येय गाठणे आणि त्याच्या माध्यमातून जीवनाचा संपूर्ण आनंद लुटणे हेच साध्य आहे. दम्याच्या व्यवस्थापनाबाबत अधिक संवाद साधण्याला प्रोत्साहन देऊन आपण जागतिक दमा दिन साजरा करूया.”
“रुग्णांनी इन्हेलर्सचा वापर थांबवण्यामागे औषधोपचारांचा खर्च, दुष्परिणाम, इन्हेलर साधनांबाबत गैरसमज यांसारखी अनेक कारणे आहेत. मानसिक अडचणींमुळेही वापर बंद केला जातो. त्यामध्ये डॉक्टरांच्या उपचारांबद्दल असमाधान, अवास्तव अपेक्षा, एखाद्याच्या परिस्थितीबद्दल मनात राग, रोगाच्या स्थितीला कमी लेखणे, आरोग्याबाबत निष्काळजीपणा आदी. दम्यावर विजय मिळवायचा असेल तर परिणामकारक उपचार म्हणजेच इन्हेलेशन थेरपी घेणे गरजेचे आहे. भारतात हे उपचार अगदी कमीत-कमी म्हणजे दिवासाला 4 ते 6 रुपयांपर्यंत इतक्या कमी किंमतीत उपलब्ध आहेत,” असेही डॉ. कदम यांनी नमूद केले.
डॉ. पोफळे म्हणाले, ”इन्हेल्ड कॉर्टिकॉस्टेरॉइड थेरपी (आयसीटी) हा दम्याच्या नियंत्रणाची पायाभरणी आहे. कोणत्याही उपचारांचा परिणाम साधण्यासाठी व सुरक्षितता राखण्यासाठी पद्धती आणि आवश्यक तेवढे औषध देणे महत्त्वाचे असते. औषध दाह होणार्या श्वसनमार्गात लहान डोसच्या स्वरूपात थेट पोहोचते. त्यामुळे संभाव्य दुष्परिणाम कमी होतात. आयसीटीद्वारे दिल्या जाणार्या औषधाच्या प्रमाणाच्या तुलनेत तोंडावाटे दिल्या जाणार्या औषधांचे प्रमाण अधिक असल्याने दुष्परिणाम संभवतात. तरीही, अज्ञानामुळे अनेक रुग्ण हे उपचार घेतात. अनेकांनी ‘स्टिरॉइड्ज’ हा शब्द ऐकला की त्यांना शरीरातील स्नायू बळकट करणार्या पदार्थांचीच आठवण होते. बरेचदा कॉर्टिकोस्टिरॉइड्ज आणि अनॅबोलिक स्टिरॉइड्ज यांच्यात गोंधळ केला जातो.”
राष्ट्रीय दमा शिक्षण आणि प्रतिबंधक कार्यक्रमाच्या (एनएईपीपी) ताज्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, एक वर्षाच्या मुलापासून सर्व वयोगटांतील साध्या किंवा वारंवार होणार्या दम्यासाठी इन्हेल्ड कोर्टिकोस्टिरॉइड् थेरपीचा (आयसीएस) वापर करण्यात यावा. इन्हेल्ड कोर्टिकोस्टिरॉइड्मुळे रुग्णाच्या दैनंदिन जीवनाच्या दर्जात सुधारणा होत असल्याचे लक्षात आले आहे. तसेच दम्याचा झटका येण्याचे प्रमाण कमी करण्यात तसेच दमा नियंत्रणात, तोंडावाटे स्टिरॉइड घेण्याची गरज कमी करण्यात तसेच ईआरच्या वार्यांचे प्रमाण कमी करण्यात व रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी करण्यातही इन्हेल्ड कोर्टिकोस्टिरॉइड्जची मदत होत आहे.
यावर्षी जागतिक दमा दिनी आपण दम्यावर विजय मिळवणार्यांचे यश साजरे करत आहोत, ज्यांनी दम्याविरुद्धचा त्यांचा लढा जिंकला असून, त्यासंबंधी गैरसमजांवरही मात केली आहे. आजार, त्याचा स्वीकार आणि त्याची योग्य थेरपी घेणेबद्दल जागृती निर्माण केल्यामुळे दम्याविरुद्ध आपण एकत्रितपणे विजय मिळवू शकू. आज, ज्यांनी इन्हेलेशन थेरपीच्या माध्यमातून दम्यावर विजय मिळवणे शक्य करून दाखवले, त्यांच्याकडून आम्ही धडा घेत आहोत. त्यांच्याप्रमाणेच ‘बेरोकजिंदगी’ जगण्याचा प्रयत्न करुया. दमा बरा होणे शक्य नसेल, पण त्याच्यावर उपचार नक्की होतात. तुमच्या डॉक्टरांनी सुचवलेल्या इन्हेलेशन थेरपीचा अवलंब करून दमा नियंत्रणात ठेवता येतो आणि तुमच्या जगण्याचा दर्जा उंचावता येतो.