पुणे-छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी वंचित घटकांसाठी देशाच्या स्वातंत्र्या पूर्वी आरक्षण सुरु केले. त्याचबरोबर, या वंचित समाज घटकांच्या मध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा या साठी शाळा व बोर्डिंगसही उभारली. एवढेच नव्हेतर संस्कृत पाठशाळा ही काढून या घटकांना संस्कृत शिकण्याची देखील संधी दिली. खऱ्या अर्थाने त्यांनी, सामाजिक ध्रुवीकरणाचे मुहूर्तमेढ रोवली. ते दूरदृष्टीचे राजे होते. डॉ. बाबा साहेब आंबेडकर हे देशाचे नेतृत्व करतील असे भाकीत त्यांनी एका परिषदेत १९२० मध्येच केले होते व ते खरे ठरले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रमाणेच महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणेतून देशातील वंचित समाज घटकातील वर्गाला उद्योजक बनण्याचे स्वप्न बघून त्यासाठी अविरत झटणारे पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांचे मोठे योगदान आहे आपल्या वंचित समाजाला पुढे आणायचे आहे हे आपले कर्तव्य आहे असे मानून काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांचे कौतुकच केले पाहिजे. त्यांच्या दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची सुरुवात त्यांनी पुण्यातून केली .ही मोठी बाब असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कुलगरू या नात्याने त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. असे उद्गार सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज काढले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षाच्या पूर्व संध्येला जेष्ठ उद्योजक डॉ मिलिंद कांबळे यांना विशेष पुरस्कार पत्रकार भवन येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला त्या वेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
संवाद पुणे आणि समर्थ युवा फौंडेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांना शिंदेशाही पगडी, मानपत्र, स्मृतीचिन्ह, उपरणे व छत्रपती शाहू महाराजांवरील पुस्तक कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर संवाद पुणेचे अध्यक्ष सुनिल महाजन आणि समर्थ युवा फौंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे होते .
सत्काराला उत्तर देताना पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले की छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच आरक्षण देऊन अनुसूचित जाती जमाती, दलित व मागासवर्गीय यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना दिली. महात्मा ज्योतिबा फुले हे जसे समाज सुधारक होते तसेच ते उत्तम व्यावसायिक म्हणजे उद्योजकही होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्याघटनेचे शिल्पकार होते तसेच उत्तम व्यावसायिक वकीलही होते त्यांचे आदर्श घेत अनुसूचित जाती जमाती, दलित मागासवर्गीय समाज घटकातील युवा वर्गाने आरक्षणाचा लाभ घेत शिक्षण नोकरी करावी त्याच बरोबर उद्योजक बनण्याचा पर्यायही त्यांना उपलब्ध आहे. असे सांगून त्यांनी म्हटले की, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्य या युवा वर्गाला उद्योजक बनविण्याचे असून देशात त्या साठी अवश्यक धोरणे व संस्थात्मक सहयोगही मिळत आहे. ‘मुद्रा लोन’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आज देशात २९ राज्ये व ७ परदेशांमध्ये संस्थेचे काम चालू असून अनुसूचित जाती जमाती दलित मागासवर्गीय समाज वर्गातील युवकांनी उद्योजक बनण्यावर भर द्यावा असे आवाहन केले. पुणेकरांनी कौतुकाने पाठ थोपटली याबद्दल पुणेकरांचे मी आभार मानतो असे ते शेवटी म्हणाले.
प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली . संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी स्वागत केले. समर्थ युवा फौंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन केले. या प्रसंगी सौ सीमाताई कांबळे यांचा देखील सत्कार करण्यात आला .आभार प्रदर्शन निकिता मोघे यांनी केले.