ही अनोखी पर्वणीअभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी–४५ प्रकारचे तांदूळ महोत्सवात
पुणे : जीवनावश्यक वस्तू उत्तम पद्धतीने घरपोच पोहोचविण्याची सेवा ग्राहक पेठ व इतर संस्था देत आहेत. पुण्याने मला ख-या अर्थाने मोठे केले. पुण्यामध्ये आता अनेक प्रकारचे महोत्सव होतात. परंतु या महोत्सवांची सुरुवात ग्राहक पेठेने तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून केली. गृहिणींकरीता असे विविध प्रकारचे महोत्सव ही अनोखी पर्वणी असते, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ग्राहक पेठेच्या वतीने सदाशिव पेठ खजिना विहिर चौक येथे आयोजित २९ व्या तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज अॅन्ड कंपनीचे राजेश शहा, महोत्सवाचे प्रमुख शैलेश राणिम यावेळी उपस्थित होते. बासमती, आंबेमोहोर, दुबराज पासून इंद्रायणी पर्यंत तब्बल ४५ प्रकारचे तांदूळ महोत्सवात पहायला मिळत आहेत. उद््घाटनप्रसंगी मावळमधील शेतक-यांचा देखील सन्मान करण्यात आला.
राजेश शहा म्हणाले, मागील २९ वर्षांपासून ग्राहक पेठ तांदूळ महोत्सव सुरु आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तांदूळ स्वस्त दरात ग्राहकांपर्यत या माध्यमातून पोहोचत आहे. तब्बल ४५ प्रकारचे तांदूळ या महोत्सवात ग्राहकांकरिता उपलब्ध करुन देण्यात येणे, हे याचे वैशिष्टय आहे.
सूर्यकांत पाठक म्हणाले, महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांचे व प्रामुख्याने महिलांचे एकत्रिकरण होत आहे. ग्राहकाने एका वेळेस १०० किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे. महोत्सवात उत्तमप्रतीचा तांदूळ थेट महाराष्ट्राबाहेरील राज्यांसह नाशिक, मावळ, भोरहून पुणेकरांसाठी उपलब्ध दिला जात आहे. याशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला तांदूळ देखील महोत्सवात अत्यल्प दरात उपलब्ध आहे. तरी ग्राहकांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.