पुणे- ३२० शिक्षकांची भारती ठरलेली असताना प्रत्यक्षात २८९ शिक्षकांची नियुक्ती केलेल्या पुणे महापालिकेत प्रत्यक्षात मात्र केवळ १२० शिक्षकच रुजू झाल्याने पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाची अवस्था मोठी दयनीय झाली आहे. स्मार्ट सिटी च्या नावाखाली रंगरंगोटी करणाऱ्या आणि दरवर्षी पूर येऊ नये म्हणून नालेसफाई ची नाटके करणाऱ्या अब्जावधीची उड्डाणे घेणाऱ्या पुणे महापालिकेने खुद्द स्वतःच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या सुरक्षा रक्षकांना तर वाऱ्यावर सोडलेले आहेच पण आता महापालिका शाळेतील गोरगरीब मुलांना शिकविण्यासाठी मेहनत घेऊ पाहणाऱ्या शिक्षकांची देखील आर्थिक पिळवणूक सुरु ठेवली आहे. येथे एकवट पद्धतीने दरमहा १५ हजार रुपये वेतन दिले जात असल्याने आता महापालिका शाळांना शिक्षक मिळेनासे झाले आहेत . हजारो कोटींची मेट्रो, नदी सुधार प्रकल्प अशा विविध बाबींवर उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेने चालविलेली हि सेवकांची आर्थिक पिळवणूक येथे शासनाने पाठविलेल्या आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्यांना कशी दिसत नाही , ते सोयीस्करपणे कशी डोळ्यावर पट्टी ओढून घेतात ? असे सवाल यानिमित्ताने पुढे येत आहेत .
याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन कदम म्हणाले कि,’राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. यापूर्वीही शाळा सोडल्याचा दाखल्याविना मनपा शाळेत प्रवेश द्यावा याची आग्रही व यशस्वी मागणी केली होती.कोरोना प्रादुर्भाव काळात खाजगी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची शालेय फी थकल्यामुळे अनेक पालकांनी पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेतले. त्यामुळे साहजिकच महानगरपालिका शाळांचा पट मोठ्या संख्येने वाढला असून त्याकरिता ३५० शिक्षकांची भरती होणे आवश्यक असताना २८९ शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्यात आली. तरी देखील त्यातून फक्त १२० शिक्षक सेवेत रुजू झाले.आम्हाला माहिती प्राप्त झाल्यानुसार सदर शिक्षकांना एकवट १५ हजार मासिक पगार दिला जातो. अपुऱ्या पगारामुळे, नौकरीच्या अनिश्चिततेमुळे कदाचित शिक्षकांनी याकडे पाठ फिरवली आहे. याच तुलनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षकांना एकवट २५ हजार मासिक पगार देत आहे.
महत्वाचे म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्राथमिक शिक्षण देणे ही पुणे मनपाची जबाबदारी असून शिक्षकांअभावी त्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तातडीने आवश्यक ती शिक्षक भरती करून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही राष्ट्रवादी अर्बन सेल ची आग्रही मागणी आहे.