तेव्हा माझ्या डोळ्यात पाणीच आले ः शरद पवार- सुशिलकुमार शिंदे यांना महर्षी पुरस्कार प्रदान
पुणे-माझ्या सांगण्यावरून सुशिल कुमार यांनी पोलीस खात्यातील नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तिकीट मिळवून देऊ शकलो नाही, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले होते. त्यानंतर मात्र शिंदे साहेबांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी ते स्वत:च्या कतृत्वावर आमदार खासदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल झाले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढले. पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा महर्षी पुरस्कार सोमवारी माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महोत्सवाचे संयोजक माजी उपमहापौर आबा बागुल,जयश्री बागुल व्यासपीठावर उपस्थित होते.
सन्मानचिन्ह,मानपत्र,पुणेरी पगडी, चांदीची मुद्रा, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त कृतज्ञता म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात 125 वर्षे पुर्ण झालेल्या कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे विश्वत अध्यक्ष अॅजड. प्रताप परदेशी आणि प्राचीन पर्वती देवदेवेश्वर संस्थानचे अध्यक्ष रमेश के. भागवत यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात येईल.
शरद पवार म्हणाले, पुण्यामध्ये जेवढे पुरस्कार दिले जातात, तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नाहीत. पुरस्कार देणारे, पुरस्कार ठरवणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे ही ठाराविक मंडळी आहे. पुरस्कार ठरवणारे देखील अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला हे लोक तर निवेदनासाठी प्रकाश पायगुडे, सुधीर गाडगीळ हे लोक असतात. निवेदक पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचे जीवन खुलविण्याचे काम करतात.
सुशिलकुमार शिंदे म्हणाले, शरद पवार हे महाराष्ट्राचे व देशाचे आकर्षण आहेत. त्यांनीच मला हात धरून राजकारणात आणले. शरदराव खर्या अर्थाने यशवंतराव चव्हाण यांचे मानस पुत्र आहे. त्यांचे अतूट नाते आम्ही जवळून पाहिले आहे. यशवंतरावांशी असलेले नाते पवार साहेबांनी मुंबईल यशवंतराव चव्हाण रिसर्च सेंटरच्या माध्यमातून जपले आहे. शरद पवार माझ्यापेक्षा साडे आठ महिन्यांनी मोठे आहेत, मात्र ते विचारांनी, कर्तृत्वाने मोठे आहेत, ते कायमच मोठे राहतील. समाजातील न दिसणारी माणसं पकडून शरद पवारांनी यांनी त्यांचे दर्शन समाजाला घडवले. तेव्हढेच नाही तर त्यांना उमेदवारी, देवून निवडूनही आणायचे. मी त्यांच्याकडून राजकारणातील डावपेच शिकलो.
कार्यक्रमात आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. ते म्हणाले की, मैत्री कशी असावी याचे देशातील उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार व सुशिलकुमार शिंदे आहे. आपल्या मित्राला उंचीवर नेण्याचे काम शरद पवारांनी मोकळ्यापणांनी केले. असा सत्कार म्हणजे एका अर्थाने राजकीय गुरुने राजकीय शिष्याचाच सत्कार आहे. यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला.
प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन करेले तर घनशाम सावंत यांनी आभार मानले.
तर पवार साहेब देशाला कळलेच नसते ः
शरद पवार यांनी 1978 साली पुलोदचा प्रयोग केला नसता तर देशाला शरद पवार काय चीज आहे, हे देशाला कळाले. त्याचवेळी देशाला शरद पवार हे वैचारीक व दूरदृष्टी असलेले नेते आहेत, हे कळले. ते सर्व धर्म समभाव विचार घेवून देशभर फिरतात.
उल्हास पवार म्हणाले, ज्यांना पुरस्कार दिला जातोय आणि ज्यांच्या हस्ते दिला जातोय ते सर्वच महान आणि आदर्शवादी व्यक्तीमत्व आहेत. पवार साहेब रत्नपारखी आहेत, त्यांनी शिंदेसाहेबांना पारखले आणि त्यांना योग्य वेळी राजकारणात आणले. पवार साहेबांनी राज्यातील अनेकांना राजकारणात आणले. आज राजकीय पटलावर ज्यांचे सर्वांनी मार्गदर्शन घ्यावे, अशा आदर्श नेत्यांमध्ये शरदरावांची गणना सर्वप्रथम होते. शिंदे साहेबांनी तर राज्याचा अर्थसंकल्प नऊ वेळा मांडला.
आज मत्सर द्वेश, आसुयेचे राजकारण सुरू आहे, मात्र पवारसाहेब आणि शिंदेसाहेब या दोघांनी पक्ष भेद न मानता गुरू शिष्याचे नाते जोपासले. माणसानं जमिनीवर रहायला हवे, आणि राजकीय जीवनामध्ये सर्वसामान्यांना कसे संबंध जोपासावे, या दोन नेत्यांकडून नेत्यांकडून शिकावे..
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, पवार साहेबांचे राज्य आणि देशाच्या घडामोडीत मोलाचे योगदान आहे. त्यांनी समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून जे काम केले ते सर्वांच्या स्मरणात कायमस्वरूपी राहणारे आहे. सुशिलकुमार शिंदे यांचा राजकीय प्रवास तर प्रेरणादायी आहे. ज्या-ज्या पदावर ते बसले, त्या पदावरून त्यांनी गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम केले. पवार साहेब आणि शिंदे साहेबांच्या काळात राजकारण सुसंस्कृतपणाचे होते, पण सध्या त्याची घसरण होत आहे. आपण आमच्यासारख्या नवीन पिढीला पुढील काळात मार्गदर्शन करावे.
महापालिकेच्या माध्यमातून एक आदर्श शाळा उभी राहू शकते, हे आबा बागुल यांनी पर्वती येथील राजीव गांधी इ लर्निंग शाळेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
– डॉ. विश्वजीत कदम
सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांचे कौतूक करुन म्हटले की, आबा बागुल चांगले काम करणारे नेते आहे. हा पुणे नवरात्रौ महोत्सव गेली 28 वर्षे सलगपणे चालू आहे. स्वतः आबा बागुल गेली 30 वर्षे नगरसेवक आहे. त्यांच्याकडे लक्ष द्या. पवारसाहेब, तुम्ही पावरफूल नेते आहात. ते दुसर्या पक्षात असते, आतापर्यंत आमदारही झाले असते. त्याचबरोबर मंत्रीही झाले असते. व्यासपीठावर शरद पवार आहेत. त्यांच्या शब्दालाही वजनही मोठे आहे. त्यांनी जर वरीष्ठाकडे शब्द टाकला तर निश्चित घडू शकेल.
हा धागा पकडून शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले, सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आता जे सांगितले त्यावर मी बोलू शकत नाही. मी काही बोललो तर काही वेगळेच घडेल त्यापेक्षा सुशीलकुमार शिंदे यांची दिल्लीतील वरीष्ठांशी चांगले संबंध आहेत. आबांच्या विषयी मनातले जे बोलेले ते त्यांनी दिल्लीतील वरीष्ठांना सांगावे. तर आबांना निश्चित न्याय मिळेल, असेही पवार म्हणाले.