पुणे- राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत, शरद पवारांन आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या अगोदर विधान परिषदेसाठी शब्द दिला होता. असं देखील माध्यमांसमोर बोलून दाखवलं आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना महत्वपूर्ण माहिती दिली व मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे, असं देखील सांगितलं आहे.
शरद पवार म्हणाले, “राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जी यादी राज्यपालांना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे. ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं, राज्यपालांकडे असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्या संबंधीचा अंतिम निर्णय हा राज्यपालांकडून आलेला नाही. त्यामुळे एकदा आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना, मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधानं कशी केली जातात? किंवा आणखी काय, काय… पण आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलेलं आहे. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचं असेल, तर मला त्यावर भाष्य करायचं नाही. पण मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतो आहोत.”
याचबरोबर, मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून भाजपा, मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे, याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, “केंद्र सरकराने राज्य सरकारला या संदर्भात मार्गदर्शन तत्व दिलेली आहेत. त्यामध्ये आणखी काही दिवस थोडी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. राज्यसरकार विशेषता मुख्यमंत्री कटाक्षाने आवाहन करत आहेत. आता अन्य घटकांची त्याबद्दलची काही विविध मतं असतील, लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. परंतु, केंद्र सरकार ज्यावेळी अशी भूमिका घेतं. त्यावेळी कमीत कमी त्या केंद्र सरकारच्या विचाराचे जे राज्यात लोक आहेत, त्यांनी तरी तारतम्य ठेवायची आवश्यकता होती. यापेक्षा मला अधिक काही सांगायचं नाही.”हरियाणामध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जवरून शरद पवारांनी सरकारवर टीका केली, ते म्हणाले, “लाठीचार्ज ही तर गंभीर बाब आहे, त्याहीपेक्षा जवळपास १४ महिने शेतकरी घरदार सोडून त्या ठिकाणी बसले आहेत. थंडी, ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता. संवेदनशील राज्यकर्ते असतील तर त्यांनी इतक्या दिवस शेतकरी बसतात, याची नोंद त्यांनी घ्यायला हवी होती. पण दुर्दैवं आहे या सगळ्या अन्नदात्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची भूमिका आहे.” अ